पक्षांतरामुळे बदलले विधानसभा निवडणुकीतील डावपेच ; ‘अशी’ असेल इगतपुरीतील राजकीय उलथापालथ : आज घोषित होणार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरीत एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाण्याचा इतिहास आहे. आमदारकीसाठी असा आटापिटा ह्या मतदारसंघात बऱ्याचदा दिसतो. ह्या निवडणुकीसाठी पक्षांतराची स्थित्यंतरे घडायला सुरुवात झालेली आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल. यानंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीला वेग येणार आहे. इंदिरा काँग्रेसकडून यंदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत सगळीकडे जाणवत होते. डावलल्यानंतर ऐनवेळी बंडखोरी करून अन्य एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळवून लढण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात पक्षांतर केलेले बरे ह्या विचाराने हिरामण खोसकर यांनी पक्षांतर केले हे चांगलेच म्हणायचे. मात्र भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या महायुतीमधील पक्षांपैकी इगतपुरीची जागा परंपरेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाची आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ही एकमेव जागा शिंदे गटाने प्राधान्याने लढवण्याचे निश्चित केलेले आहे. अशा परिस्थितीत हिरामण खोसकर यांनी केलेले पक्षांतर शिवसेना शिंदे गटाच्या गोटात चिंता वाढवणारे आहे. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची सुद्धा चांगलीच तयारी केलेली आहे. खोसकर यांच्यामुळे ह्या मतदारसंघात महायुतीमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी वाढण्याचाही धोका वाढतो. राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांनीही चांगलीच तयारी केल्याने पितापुत्रांच्या भूमिकेला अत्यंत महत्व येणार आहे. काँग्रेसमधून तिकिटाचा प्रमुख दावेदार बाहेर गेल्यामुळे आदिवासी युवा नेते लकीभाऊ जाधव यांना तिकीट मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. काँग्रेसमध्येही अनेकजण तिकिटासाठी इच्छुक असल्याने काही दिवसात अजून पक्षांतरे होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना उबाठाच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित ह्या महाविकास आघाडीतून प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्याही भूमिकेवर विधानसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या पक्षांतरामुळे बदललेली सर्वच्या सर्व गणिते माजी आमदार निर्मला गावित यांच्या पथ्यावर पडणारी आणि काँग्रेसला नवे नेतृत्व उभे करून देणारी ठरणार आहेत. 

माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये हे शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटासाठी उत्सुक आहेत. हिरामण खोसकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे शिंदे गटाच्या दोन्ही इच्छुकांना चिंता वाटणे साहजिक आहे. युतीपैकी राष्ट्रवादीला इगतपुरीची जागा सुटण्याची शक्यता नाही पण सुटलीच तर अनेक स्थित्यंतरे घडू शकतात. अथवा राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढू शकतो असे म्हणायला पण जागा आहे. बाळासाहेब शिवराम झोले हे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेऊन लढायला उत्सुक आहेत. उबाठा शिवसेनेच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित यांना पक्षाकडून तयारी करायला सांगण्यात आलेले असल्याने त्यांच्याकडून तिसऱ्यांदा आमदारकीसाठी आखणी, डावपेच सुरु झाले आहेत. बदललेल्या परिस्थितीत ऐनवेळी त्यांची भूमिका सुद्धा बदलली जाऊ शकते. मात्र त्यांची कोणतीही भूमिका ठरली तरी त्यांच्या फायद्याचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे कोणीही नाकारणार नाही. मागील निवडणुकीत वंचितच्या तिकिटावर तिसऱ्या क्रमांकावर असणारे आदिवासी नेते लकीभाऊ जाधव काँग्रेसच्या तिकिटाचे सध्याच्या स्थितीत प्रबळ दावेदार ठरले आहेत. काही राष्ट्रीय आणि प्रदेश नेत्यांनी त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी केल्यामुळे त्यांना संधीचे सोने करायला जागा आहे. मनसेकडून प्रताप जाखेरे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र ऐनवेळी अन्य पक्षाचा टाळलेला दिग्गज उमेदवार मनसेचा उमेदवार असू शकतो. राजकीय उलथापालथीमुळे उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनाही उमेदवारी करण्याची संधी नाकारता येणार नाही.

पक्षांतराचा इतिहास – पक्षांतर करून पहिली निवडणूक लढवण्याचा मान तत्कालीन आमदार भाऊ सक्रु वाघ यांना जातो. 1980 मध्ये भाऊ वाघ यांनी काँग्रेस सोडून अर्स काँग्रेसमध्ये जाऊन पक्षांतर केले. तथापि त्यावेळी ते पराभूत झाले होते. 1985 मध्ये भाजपा सोडून अर्स काँग्रेसमध्ये शिवराम झोले यांनी प्रवेश केला. यानंतर पुलोदची उमेदवारी घेऊन विजयी ते आमदार ठरले. 1990 मध्ये भाजपाची कोणत्याही प्रकारची लाट नव्हती. ह्या मतदारसंघात भाजपाचे बळ अजिबात नव्हते. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून मिळणारी उमेदवारी सोडून इंदिरा काँग्रेसमधून यादवराव बांबळे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या कमळ चिन्हावर युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. भाजपाचे ह्या मतदारसंघातील पहिले आमदार होण्याचा बहुमान यादवराव बांबळे यांच्याकडे जातो. पुढे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा स्वगृही काँगेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी 1995 ला अपक्ष लढवली होती.1995 मध्ये अर्स काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. त्यावेळी शिवराम झोले यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळवली. 1999 मध्ये पांडुरंग बाबा गांगड यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत जात शिवधनुष्य हाती धरले. शिवसेनेची उमेदवारी मिळवून ते युतीचे आमदार झाले. ह्याचवेळी शिवराम झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली होती. डाव्या आघाडीच्या तिकिटावर यापूर्वी निवडणूक लढून पराभूत झालेले काशीनाथ मेंगाळ यांनी 2004 ला मातोश्रीवरून शिवबंधन बांधून घेतले. शिवसेनेची उमेदवारी मिळवून ते तालुक्यातील सर्वात युवा आमदार म्हणून विजयी झाले. 2009 ला निवडणुकीच्या तोंडावर काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मेंगाळ यांनी प्रवेश करून तिकीट मिळवले. ह्याचवर्षी लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी नाशिक मनपाच्या नगरसेविका आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात इंदिरा काँग्रेसचे तिकीट दिले. गावित यांनी मनसेचे उमेदवार काशीनाथ मेंगाळ यांचा पराभव करून स्थान भक्कम केले. पुढे 2014 मध्ये काशीनाथ मेंगाळ यांनी मनसेची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढवली. यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ह्याचवर्षी शिवराम झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला आणि शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले. निर्मला गावित यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये निर्मला गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली मात्र त्या पराभूत झाल्या. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते आमदार म्हणून निवडून आले होते. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटात पक्षांतर केले आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!