१६ वर्षांपासून वारकरी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारी करणारे पिंपळगाव डुकरा येथील उत्तमराव झनकर

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – “भेटी लागे जिवा लागलीसे आस” या अभंगा प्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस आषाढी एकादशीच्या निमित्ताने  सदैव वारकऱ्यांना लागलेली आहे. या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील वारकरी पताका खांद्यावर घेऊन माजी सरपंच उत्तमराव झनकर हे गेल्या १६ वर्षांपासून त्यांची पत्नी सौ. रंजना यांच्यासह पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत पायी वारी करीत हरिनामाचा जप करतात. यावर्षी त्र्यंबकेश्वर च्या निवृत्तीनाथ महाराज ते पंढरपूर दिंडीत ते सामील झाले आहेत. बालपणापासूनच धार्मिक कार्याची आवड असलेले झनकर विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. दररोज न चुकता पांडुरंगाचे चिंतन करीत असतात. सकाळी घरात पूजा तर गावात मंदिरात जाऊन हरिपाठ आणि न चुकता भजन करून अखंड भक्ती करीत असतात. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे या न्यायाने शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या झनकर यांना गोरगरिबांची जाणीव असून माणसामध्येच खरे परमेश्वराचे अस्तित्व असून भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करीत असतात. या अनमोल देहाचा चांगला उपयोग करून गोरगरिबांच्या सेवेत व परमार्थिक कार्यात सत्कारणी लागला पाहिजे. आई वडिलांचे पूजन दर्शन हे महत्वाचे असून खरा परमेश्वर त्यांच्यामध्ये आहे. जो पर्यंत हृदयात श्वास आहे तोपर्यंत परमेश्वराची भक्ती पायी दिंडी वारी करणार असल्याचे उत्तमराव झनकर यांनी सांगितले. “नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली” रस्त्याने एक जरी पाऊल टाकले तरी एक यज्ञाचे पुण्य पंढरीच्या वाटेला  घडत असते असेही त्यांनी सांगितले. या पायी दिंडीत भिकाजी मेदडे, विठ्ठल शिंदे, नाठे बाबा, शैला भगत आदी इगतपुरी तालुक्यातील वारकरी सहभागी झाले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!