लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम्

इगतपुरीनामा न्यूज – दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी मतदान होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. लोकशाही बळकट करण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी आज नाशिक येथे दिले. निवडणुकीत पैसा, मद्य, इतर कोणत्याही आमिषाचे वाटप, बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. सोशल मीडियावरील गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर सूक्ष्म लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरित खंडन करणे आवश्यक आहे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा नाशिकचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम्‌ यांनी अंबड येथे भेट देऊन स्ट्राँग रूम व मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

एस. चोक्कलिंगम् म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सर्व प्रयत्न करावेत. निवडणूक आयोगाकडूनही मतदानासाठी आवाहन करणारे मेसेज केले जात आहेत. मतदान केंद्रे आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज ठेवावीत. त्याबाबत मतदारांमध्ये पुरेशी जनजागृती करावी. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांसाठी प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्यात. मतदानाच्या दिवशी पाऊस आला तर पर्यायी नियोजन तयार ठेवावे. मतदार माहिती स्लीप आणि माहिती पत्रकाचे वाटप वेळेवर करावे. मतदार यादीत नाव न सापडण्याच्या तक्रारींचे निराकरण तात्काळ करावे. त्याच ठिकाणी मतदार यादीत नावाच्या समावेशाचा अर्ज भरून घ्यावा, जेणे करून विधानसभा निवडणुकीवेळी असे प्रकार रोखले जातील. ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर प्रतिबंधित वस्तू जाणार नाहीत, यासाठी दक्ष राहावे. सी-व्हिजिलवरील तक्रारींचे १०० मिनिटात निराकरण करावे, वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस विभागासोबत सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.

Similar Posts

error: Content is protected !!