जीर्ण पोल आणि लोंबणाऱ्या तारा तातडीने बदला अन्यथा आंदोलन करण्याचा स्वराज्य संघटनेचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी  जीर्ण झालेले विद्युत पोल आणि लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या ठरत आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. जीर्ण झालेले पोल व वितरण व्यवस्था बदलण्याची गरज असून अधिकारी फक्त टोलवाटोलवी करत असल्याची सध्या परिस्थिती आहे. मंडळाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र शिरसाठ, इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले यांनी दिला आहे. टाकेद बुद्रुक येथे जीर्ण पोल ४ महिलांच्या अंगावर पडल्याने त्या जखमी झाल्या. ह्या घटनेचा स्वराज्य संघटनेने निषेध करून संताप व्यक्त केला. गेल्यावर्षी भोईरवाडी येथे विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा वाहनावर पडल्याने  वाहनांचे मोठे नुकसान झालेले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गंजलेले, वाकलेले पोल, विजेच्या तारा असून शेतीची कामे करण्यास शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी उघड्यावरील रोहित्र धोकेदायक बनले आहेत.

महवितरण कंपनी बिलवसुलीची सक्ती ज्या पद्धतीने करते त्या बदल्यात मात्र विद्युत पुरवठा व्यवस्थापन सुरळीत ठेवत नाही. ह्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही. इगतपुरी तालुक्यातील वीज वितरण कंपनीने  पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. रुपेश नाठे, उपजिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र शिरसाठ, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा वारकरी परिषदेचे अध्यक्ष नारायण जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, कामगार आघाडीचे रविकांत धोंगडे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष शिवाजी काजळे, आरोग्य चिटणीस जालिंदर कार्ले, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष हरीश कुंदे, उपतालुकाध्यक्ष सखाराम गव्हाणे, तालुका सरचिटणीस श्रीराम रणमाळे, महेश जाधव, माजी उपसरपंच गौतम भोसले, घोटी गटप्रमुख बाळु सुरुडे, तालुका संघटक कृष्णा गभाले, पप्पू शेलार, कैलास गव्हाणे, मीरा कुंदे, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे गणेश सहाणे, अरुण जुंद्रे, ईश्वर भोसले, दीपक खातळे, गोरख वाजे आदींनी दिला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!