
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे गेल्या अनेक महिन्यापासून ग्रामस्थांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. यामुळे आज सकाळी गावातील महिला, युवती आणि ग्रामस्थ यांनी हंडा मोर्चा काढला. बलायदुरी गावापासून निघालेल्या हंडा मोर्चाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. तातडीने याप्रकरणी योग्य त्या सर्व उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. दोन दिवसात याबद्दल प्रत्यक्षात कार्यवाही करू असे ग्रामसेविका स्वाती शिंदे यांनी महिलांना सांगितले. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामसेविका स्वाती शिंदे यांनी ग्रामस्थांना माहिती दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. याबाबत चालढकल झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. यावेळी माजी सरपंच कैलास भगत, खादी ग्रामोद्योगचे संचालक भगीरथ भगत, अशोक पवार, पांडुरंग गटकळ, निवृत्ती भगत, काळू गटखळ, रामदास भगत, धनराज दुभाषे, सोनूबाई गटखळ, सुंदराबाई भगत, उज्वलाबाई आव्हाड, शकुंतला भगत, सरला भगत, गंगुबाई भगत, रुक्मिणी भंडारी, फुलाबाई गटकळ आदी उपस्थित होते.