त्र्यंबक घोटी मार्गावर पर्यटक बसचा पाठलाग करून हल्ला : काठ्या-दगडांनी वाहनाची तोडफोड ; ४ जण अटक 

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वरहून हरिहर किल्ला परिसरात पर्यटनासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन घोटीकडे परतणाऱ्या वाहनाला बोरीची वाडी परिसरात अडवून चालक व साक्षीदारांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर काही जणांनी वाहनाचा पाठलाग करून वावी हर्ष येथे वाहन अडवले आणि काठ्या व दगडांनी वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्र्यंबकेश्वरघोटी मार्गावरील बोरीची वाडी व वावी हर्ष परिसरात घडली. फिर्यादी नागराज जगदीश गिरीगौंड हे KA-01-AD-0056 या वाहनातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन हरिहर किल्ला परिसरातून घोटीकडे जात होते. बोरीची वाडी येथे मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून आरोपींनी कुरापत काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर संबंधितांनी जमाव जमवून मोटारसायकलीवरून वाहनाचा पाठलाग केला आणि वावी हर्ष येथे वाहन अडवले. यावेळी फिर्यादी आणि साक्षीदारांना काठ्या तसेच हाताने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या पुढील काचेचे आणि उजव्या बाजूच्या आरशाचे नुकसान करण्यात आले. तसेच वाहनाच्या छतावर आणि बंपरवर काठ्या व दगडांनी मारून तोडफोड केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीबरोबरच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींपैकी अजय चंदर जाधव, आकाश दिलीप जाधव, अक्षय देवराम जाधव आणि देविदास मधुकर जाधव या चौघांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, घटनेचा पुढील तपास घोटी पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार एका आरोपीविरुद्ध यापूर्वीही घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

error: Content is protected !!