घोटी खुर्द येथे 5 एकर ऊस जळून खाक : शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द शिवारात शॉर्टसर्किटमुळे तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वीज वितरणच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यासह घोटी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकरी रामनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी घोटी खुर्द येथे दारणा धरणालगतच्या आपल्या शेत गट नंबर 165, 166, 168, 172(1) (2)  मध्ये 7 एकर उसाची लागवड केली होती. वर्षभर काबाडकष्ट करत उसाला जगवण्यासाठी त्यांनी रात्र-रात्र पिकाला पाणी दिले होते. अशात काही दिवसांपासून ऊसही तोडणीला आला होता. मात्र, संगमनेर व अकोला येथील साखर कारखान्याचे ऊसतोड कामगारांकडून ऊसतोडही केली जात नव्हती. अशात रामनाथ शिंदे यांनी कारखान्याला निवेदन देत लवकरात-लवकर ऊसतोड करण्याची मागणी केली होती. पुढील 2-3 दिवसांत ऊसतोड होणार असल्याने तेही समाधानी होते. मात्र, अशात दि. 12 रोजी त्यांच्या शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये हवेने घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली. अशात हवेचा वेगही अधिक असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील शेतकऱ्यांनी आगीचे लोळ बघताच शिंदे यांना याबाबत माहिती दिली. शिंदे यांनी तात्काळ शेताकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने व्यापक रूप धारण केल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्यांचा तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाला. शेतातून गेलेल्या वीजतारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोळ पडल्याने थोड्याश्या हवेमुळे या तारा एकमेकांना खेटत असतात. अनेकवेळा वीज वितरणला याबाबत माहिती देऊनही त्यांच्याकडून दखल न घेतल्याने ह्या घटनेत त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसल्याची तीव्र भावना शेतकरी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. शासनाने त्वरित दखल घेत नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!