इगतपुरीनामा न्युज, दि. 27
केंद्र सरकारने भाताचा भाव 1940 रुपये प्रति क्विंटल घोषित केला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने हरसुल येथे खरेदी केंद्र सुरू केले आहे. परंतु शासनाकडुन योग्य तो प्रचार प्रसार न झाल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. ऑनलाईन नोंदणी न केल्याने अनेक शेतकरी या योजनेपासुन वंचित राहत असतात. म्हणून याची दखल घेऊन सर्व शेतकरी बंधुना आवाहन करण्यात आले आहे. 30 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार हमीभाव खरेदी योजने अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. भात, मका, ज्वारी, बाजरी आदी खरेदीची पीक पेरा लावलेला चालू हंगामाचा सातबारा उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आवश्यक कागदपत्रे घेऊन हरसुल, चिंचवड, सारस्ते येथील खरेदी केंद्रात 30 नोव्हेंबरच्या आत जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालिका ताराबाई माळेकर, काँग्रेसचे नेते विनायक माळेकर, हरसुल सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण मेघे, पेठ येथील उप प्रादेशिक व्यवस्थापक रोहीत बनसोडे, विपणन निरीक्षक विश्वेस पाटील, गोदामपाल योगेश भागवत आदींनी केले आहे.