लॉकडाऊन वर्षपूर्तीनिमित्त….
“पुन्हा असा अनुभव कुणालाही नको अशी ती भयावह परिस्थिती होती. आजार नवीन,व्हायरस नवीन,नेमकी काय ट्रीटमेंट ह्या आजाराला बरं करू शकेल ह्याचा पूर्ण जगाला काहीच थांगपत्ता लागत नव्हता.अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून आणि त्यातल्या त्यात होमिओपॅथी डॉक्टर म्हणून त्या काळात खूप कोविडच्या रुग्णांची होमिओपॅथी औषधांच्या माध्यमातून कोरोनाला प्रतिबंधात्मक व उपचार देखील करता आले. डॉक्टर असल्याचा खराखुरा अभिमान त्या काळात अनुभवायला आला. ज्याला कोरोना सदृश लक्षणे दिसायची त्याला लोकांनी वाळीत टाकू नये म्हणून तो सांगत नसायचा. लॉकडाऊनमुळे काम धंदा नाही, उत्पन्न नाही अशा स्थितीत लोकांनी दिवस काढलेत.
मुंबईहून परप्रांतीय लोकांचे जथेच्या जथे इगतपुरीच्या सीमेवरून पायी, सायकलीने, मिळेल त्या वाहनाने हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करून घराकडे जातांना मनाला प्रचंड वेदना होत होत्या. अनेकांचे स्वप्न, संसार, रोजगार, जवळचे आप्तेष्ट ह्या आजाराने हिरावून नेले. पण माणुसकीचा एक धडा, आपलं आणि परक्यातला फरक, कमी भौतिक साधनातही कसं छान जगता येऊ शकतं हे सर्व शिकवून गेला.
त्यावेळी एखादा रुग्ण वारला तरी त्याला कुणी खांदा द्यायलाही धजावत नव्हते, मात्र आज ती परिस्थिती नाही.”
– डॉ. प्रदीप बागल, इगतपुरी
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG-20210321-WA0050.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG-20210321-WA0050.jpg)
उद्या 23 मार्च,म्हणजे पहिला लॉकडाऊन व्हायला १वर्ष पूर्ण होतंय.. ह्या लॉकडाऊन कडे मागे वळून पाहिल्यास अनेक कटू अनुभव आल्याचे निदर्शनास येतंय, देशपातळीवर करोडो लोकांचे हाल तर झालेच,परंतु माझ्या इगतपुरी तालुक्यात अनेकांची वाताहत झालेली दिसून आली, अनेक कंपन्या बंद ठेवल्याने, कामगारांचे अतोनात हाल झाले,मार्केट बंद असल्याने, आमचा शेतकरी उभाडे, रायगड नगर, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख अशा मिळेल त्याठिकाणी कवडीमोल भावात आपला शेतमाल विकतांना पाहिला. शेतमजूर अन त्याचबरोबर आमचे बाराबलुतेदार बांधव अक्षरशः हाताचे काम बंद झाल्याने, भयानक प्रसंगातून जातांना मी पाहिले. गावचा माणूस शहरात राहणारा गावच्या आश्रयाला येतांना दिसला. अन गावानेही मोठ्या दिलदारपणे त्याला आपल्यात सामावून घेतांना मी पाहिले. शहरात जरी आपल्या पोटापाण्यासाठी राहिलो तरी गावाची नाळ तोडायची नाही. हा धडाही ह्यातून अनेकांना मिळाला. गावे शांत होतांना, रस्ते ओस पडतांना, कारखान्याचा आवाज बंद होतांना, पाहत असतांना, माझा शेतकरी मात्र आपले व्यवहार ,आपली शेती कसतांना दिसून आला. अन शेतकरी तोट्यात का होईना शेती करत राहिला म्हणून ह्या देशात लॉकडाऊन सारख्या भयंकर प्रसंगात सुद्धा माझं राज्य अन माझा देश तरतांना दिसला. मात्र लॉकडाउनच्या कटू आठवणी मागे वळून पाहिल्या तर पुन्हा लॉकडाऊन नकोच ही भूमिका माझी तरी असेल.
– विठोबा दिवटे पाटील, शेतकरी नांदूरवैद्य
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG-20210321-WA0001.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG-20210321-WA0001.jpg)
गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय जन माणसाने कधीही न ऐकलेला शब्द आणि प्रत्यक्षात उतलरेला शब्द ” लॉकडाऊन ” ( टाळेबंदी ), मास्क, सॅनिटाझर आणि विविध जंतुनाशक साबणे ! कोरोनाने तो हाहाकार माजवला. प्रत्येक व्यक्तीस आपल्या कुटुंबाची व स्वतःच्या जीवाची चिंता सतावत होती. सर्वांवर केंद्र, राज्य सरकारने पर्याय काढला. लॉकडाऊन मार्च २०२० पासून ते सुरु झाले. त्यात अनेक सामान्य भरडुन निघाले. विषेशतः जे दररोज कमावून उदरनिर्वाह करत होते असे व्यावसायिक व मजुर वर्ग प्रत्येकाला कामाचे ठिकाण सोडुन आपपल्या घरी जाण्याची ओढ होती. प्रवासी वाहतूक पूर्ण बंद असल्याने ही मंडळी उपाशी तहानलेली कशीबशी आपल्या गावापर्यंत आली. पण कोरोनाच्या भितीने गावातही कुणी घेईना ! अशी परिस्थिती निर्माण झाली. अक्षरशः फक्त दोनवेळेस मिळेल ते खावून हा कालावधी घालवला. कमावणे दुरच राहीले!
कधी लॉक तर कधी अनलॉक अशा अवस्थेत माणूस द्विधा मन:स्थितीत सापडला. सरकारने थोडी ढिलाई देवुन उद्योग व्यावसाय सुरू केले पण पुन्हा ह्या कोरोनाने डोके वर काढले। बँकांनी आपली वसुली थांबवली नाही. वीज मंडळाला सरकारने वसुलीला मोकळीक दिली. यात अजुन भर म्हणजे शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिली नाही .
निसर्गासारखे वादळे येवून भरपिके उद्ध्वस्त झाली. पण सरकारने तिजोरीचा खडखडाट दाखवून मदत दिली नाही. विमा कंपन्यानी मुद्दाम पिकविमे मंजुर केले नाहीत. आपले खिसे भरून घेतले म्हणजे या काळात शेतकरी ही पुर्णपणे ढासळला!
लॉकडाऊन काही लोकांच्या पथ्यावर पडले. विविध औषधे विकून मेडिकल व्यवसाय भरभराटीस आला. विविध जीवनावश्यक व इतर वस्तुंचे भाव वाढुन गेले. आता कमी होऊच शकत नाही. डोळे पुसून का होईना पण सामान्याला तेल साखर घ्यावेच लागणार. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले. म्हणून व्यावसायिकांनी किमती वाढवुन त्याचा बोज सामान्य माणसांवर पडला.
निसर्गसारखे वादळे येवून भरपिके उद्ध्वस्त झाली पण सरकारने तिजोरीचा खडखडाट दाखवून मदत दिली नाही. विमा कंपन्यानी मुद्दाम पिकविमे मंजुर केले नाहीत आणि आपले खिसे भरून घेतले म्हणजे या काळात शेतकरी ही पुर्णपणे ढासळला! लॉकाडाऊन काही लोकांच्या पथ्यावर पडले विविध औषधे विकून मेडिकल व्यावसाय भरभराटीस आला .विविध जिवनाश्यक व इतर वस्तुंची भाव वाढुन गेले .आता कमी होऊच शकत नाही. डोळे पुसून का होईना पण सामान्याला तेल साखर घ्यावेच लागले. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले. म्हणून व्यावसायिकांनी किमती वाढवुन त्याचा बोजा ग्राहकावर म्हणजे आपल्यावर टाकला . थोडक्यात काय तर ही मधली मंडळी तोटा सहन न करता कोरोनाच्या नावानं आपलं “चांगभलं” करून गेली!
यात फक्त गरिब व्यावसायिक, बलुतेदार मंडळी व शेतकरी मात्र या ओरबाडणाऱ्या लोकशाहीच्या ठेकदारांकडे लॉकडाउनच्या सालभर फाटक्या कपड्याने पहात राहीला! रडणारा शेतकरी आणि हताश होवून घरी परतणारा छोटा कारागिर या पांढरपेशा लोकांना लॉकडावूनच्या संपूर्ण वर्षात कधी दिसलाच नाही.
– कन्हैया जाधव, शेतकरी खेड
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/Screenshot_20210322-112119_Facebook.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/Screenshot_20210322-112119_Facebook.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/2020_4image_09_39_291042154ert-ll.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/2020_4image_09_39_291042154ert-ll.jpg)