वंचित शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई तात्काळ देण्याची प्रहारची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
गेल्या वर्षी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत हप्ता भरून संरक्षणही घेतलेले आहे. मात्र नैसर्गिक आणि अवकाळी संकटाने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या विविध पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. ह्याबाबतची सर्व पूर्तता करूनही अद्यापही अनेक शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तातडीने शेतकाऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम टाकावी अशी मागणी प्रहारचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना उल्लेखून दिलेले निवेदन निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांनी स्वीकारले. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेकडो शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली होती. मात्र काही शेतकरी बांधवांना पिक विमा योजनेअंतर्गत रक्कम खात्यावर जमा केली पण उर्वरित शेतकरी बांधव या योजनेअंतर्गत वंचित राहिले आहे. वंचित शेतकरी बांधवांना त्वरीत पिक विमा योजनेअंतर्गत भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करावी असे शेवटी म्हटले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!