
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पारदेवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शिक्षणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत वर्गखोल्यांची तीव्र कमतरता, गळके छत, वर्गात साचणारे पावसाचे पाणी आणि ओल्या व्हरांड्यात विद्यार्थ्यांना पोषण आहार घ्यावा लागत असल्याने पालक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शाळेत नवीन वर्गखोल्यांची नितांत गरज आहे. पुरेशा खोल्या नसल्यामुळे एकाच छोट्या वर्गात तब्बल ६० ते ७० विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच शिक्षणाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. सध्या पावसामुळे शाळेच्या छतावरील पत्रे अनेक ठिकाणी गळत आहेत. वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थी ओल्या आणि असुरक्षित वातावरणात बसून शिक्षण घेत आहेत. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. वर्गखोल्यांमध्ये जागेचा अभाव आणि छत गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारचा पोषण आहारही ओल्या व्हरांड्यात बसून घ्यावा लागत आहे. पावसाचे पाणी येणाऱ्या ठिकाणी जेवण करावे लागत असल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. शाळेची इमारत आणि छताची अवस्था दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने तातडीने नवीन वर्गखोल्यांना मंजुरी द्यावी, गळके छत दुरुस्त करावे आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. व्हिडिओ बातमी पहा https://youtube.com/shorts/mMu-5ZvdQqE?si=dnj86bKohVCZhnOy