व्यासंगाला प्रयोगशीलतेची जोड देत प्रगल्भतेचे दान मुक्त हस्ते वाटणारे देवतुल्य व्यक्तिमत्व इंजि. हरिभाऊ गिते यांचा प्रेरणादायी प्रवास

लेखक – श्री. भास्कर सोनवणे

अभियंते म्हणजे सृष्टीचा निर्मात्या कुशल अभियंत्याचे मूर्तिमंत प्रतीकच..! ईश्वराने साकारलेल्या भूमातेची सेवा करणारे अनेक अभियंते आजूबाजूला दिसतात. विशेषतः देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे अभियंते म्हणजे साक्षात देवदूतच !! आज अभियंता दिन, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन महाराष्ट्र राज्यात हजारो अभियंत्यांचे देवतुल्य गुरु असणारे व्यक्तिमत्व म्हणजे इंजि. हरिभाऊ कारभारी गिते..! सध्या ते मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून अव्वल कामगिरी करीत आहेत. गेली १० वर्ष सरळसेवा वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करीत सर्वांना न्याय मिळवून दिलेला आहे. व्यासंगाला प्रयोगशीलतेची जोड देत शासकीय योजना साकार करतानाच आपल्या प्रगल्भतेचे दान मुक्त हस्ते वाटणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे अभियंता दिनानिमित्त हे शब्दचित्र !

 संगमनेर तालुक्यातील सोनोशी हे इंजि. हरिभाऊ गिते यांचं जन्मगाव. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून कमवा आणि शिका या योजनेतून श्री. गिते यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण करताना अनेकविध अडचणींचा त्यांनी कायम सामना केला. इगतपुरीतील वाकी खापरी धरणाच्या निर्मितीमध्ये सहायक अभियंता म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. शासकीय सेवा करताना सोनोशी गावी त्यांनी डोंगराळ ३० एकरावर नियोजन कौशल्यातून अक्षरशः सोने पिकवले. एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या मौल्यवान पुस्तकांचे प्रभावी लेखन केले. त्यांनी लिहिलेली ६० पेक्षा जास्त पुस्तके हजारो विद्यार्थ्यांना घडवत आहेत. सिंचन क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या सूक्ष्म अभ्यासातून प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे आजवर अनेक शेतकऱ्यांना प्रगतीचे द्वार सापडले आहे.  महाराष्ट्र शासनाचे मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून इंजि. हरिभाऊ गिते यांनी काम पाहिले आहे. सध्या ते छत्रपतती संभाजीनगर येथे मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून काम पाहत आहेत. २००१-०२ मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून काम केले. २००३- ०४ एका कंपनीत असताना पुणे-सातारा चार पदरी महामार्गाच्या कामात गिते यांचे योगदान लक्षणीय ठरले. २००५ -०८ या काळात त्यांनी पुण्यातील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर अमरावती गृह व क्षेत्रविकास मंडळ येथे उपअभियंतापदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड होवून सहायक अभियंता श्रेणी १ या पदावर ते जलसंपदा खात्यात रुजू झाले. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये तत्कालीन जलसंपदा सचिव एकनाथ गायकवाड व मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला होता. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांनी बदल घडवत नावीन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (मेरी) येथे त्यांनी उपसा सिंचन योजनांच्या संकल्पचित्रांचे उपअभियंता म्हणून कामकाज पाहिले आहे. नाशिक आणि अकोला जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. नाशिकचे अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी दिमाखदार कार्य कौशल्य सिद्ध करून दाखवलेले आहे.

राज्याचे विद्यमान मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचेही विशेष कार्य अधिकारी म्हणून इंजि. हरिभाऊ गिते यांनी उत्तमरित्या काम पाहिले आहे. यासह मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता आणि नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता म्हणून त्यांचे काम आजही सुरूच आहे. अतिशय साधी सामान्य राहणी, उच्च विचार आणि निगर्वी स्वभाव ही गिते यांची व्यक्ति विशेष आहेत. वाकी खापरी धरण भागात काम करताना भूमिपुत्रांची आंदोलने, पुनर्वसनाचे वाद, मोबदल्याच्या मागण्या, पाण्याचे वाद असे प्रचंड वादळ त्यांनी पाहिले. हरिभाऊ गिते यांच्या व्यापक दृष्टिकोनामुळे अशी वादळे परिणामकारक मार्गाने थांबू शकली. गिते यांच्यामुळे हजारो कुटुंबांचे आयुष्य सर्वांगीणपणे बदलण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांची नागरिकांत इतकी लोकप्रियता पसरली की, आजही या भागातले लोक त्यांचे मार्गदर्शन घेतात. इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाची निर्मिती, स्पर्धा परीक्षांची ६० पेक्षा जास्त अनमोल पुस्तके, सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता ही त्यांची कार्यलेख उंचावणारी गगनभरारी आहे. नाशिक जिल्ह्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव बंदिस्त पुर चारी योजना त्यांनी अल्पकाळात पुर्ण केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील भोजापूर पुर चारीचे काम पुर्ण करुन पाणी या वर्षी शेवटच्या टोकापर्यत पोहचवले. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. यासाठी सक्षम शेती, विषमुक्त शेती काळाची गरज आहे. यासाठी निरंतर झटणारे त्यांचे वडील कृषी पंढरीचे वारकरी स्व. कारभारी दादा गिते यांच्या आदर्श तत्व त्यांच्यात भिनलेले आहे. आई श्रीमती सुमनबाई यांचा भक्कम आशीर्वाद, सुविद्य पत्नी इंजि. जयश्री गिते -पालवे यांची सक्षम साथ आणि संपूर्ण कुटुंबाचा आधार यामुळेच राज्यातील लोकांसाठी चांगले देण्याचा प्रयत्न केला असे ते मानतात. असे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व इंजि. हरिभाऊ गिते यांच्यासह सर्वांना अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा !

error: Content is protected !!