अल निनोच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत पाणी नियोजनाची मागणी : नगरसेवक भूषण जाधव यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – आगामी काळात अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता इगतपुरी शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नगरसेवक भूषण प्रभाकर जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी इगतपुरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात तळेगाव धरण, भावली धरण तसेच नगरपालिकेच्या जलसाठ्यांचे प्रभावी व्यवस्थापन करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील गळतीच्या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करावी, वापरात नसलेली पाणी जोडणी बंद करावी तसेच घरगुती पाणी जोडण्यांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय बंद पडलेल्या व बुजलेल्या विहिरींचे पुनर्जीवन करून पर्यायी जलस्रोत निर्माण करावेत, रस्त्यावर पाणी मारणे, वाहन धुणे व पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशीही मागणी यावेळी नगरसेवक भूषण जाधव यांनी केली.

error: Content is protected !!