खडकेद भांगरेवाडीतील विद्यार्थ्यांची जीवघेणी शाळेची वाट : गुडघाभर पाण्यातून कडवा नदी पार करत शिक्षणासाठी धडपड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या खडकेद भांगरेवाडी येथे आजही मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जीव धोक्यात घालावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे कडवा नदीला पाणी आल्याने विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून नदी पार करून शाळेत जावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लहान मुलांना पालक कडेवर घेऊन नदी पार करत आहेत, तर इतर विद्यार्थी एकमेकांचे हात धरून प्रवाहातून मार्ग काढत शाळेकडे जात असल्याचे चित्र समोर आले आहे. गावाला जाण्यासाठी सुरक्षित रस्ता किंवा पूल नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या यंदाचीच नसून मागील वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कडवा नदीला पूर आल्यानंतर सुमारे २०० लोकवस्ती असलेल्या इंदोरे भांगरेवाडीचा शहराशी पूर्णपणे संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे दैनंदिन जीवन तसेच रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी जाणेही कठीण होते. ग्रामस्थांनी मागील वर्षी जिल्हाधिकारी तसेच पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन कायमस्वरूपी पुलाची किंवा रस्त्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. दरम्यान, यंदाही पावसाळ्यात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देत कायमस्वरूपी पूल किंवा सुरक्षित रस्त्याची तातडीने उभारणी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा दरवर्षी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ कायम राहणार असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. व्हिडीओ बातमी पहा https://youtu.be/emSW_ud-7fg

error: Content is protected !!