
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या गावांमध्ये ठेकेदारांनी दळणवळणासाठी स्व खर्चाने रस्ते बनवले. त्या मार्गाने सुरळीत वाहतुकही सुरु झाली. मात्र २०२३ पासून त्या सर्व कामांची बिले अदा झालेली नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांना कर्जाचा डोंगर घेऊन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तयार केलेले रस्ते हे ठेकेदारांनी स्वखर्चाने कर्जबाजारी होऊन केलेले असून शासनाने अद्याप त्यापोटी बिल दिले नाही. म्हणून आज १५ एप्रिल पासून जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत सर्व रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला. ठेकेदार राजू पानसरे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदार जनार्धन सांगळे, दत्ता शेलार, निलेश पाटील, विशाल कातोरे, तुषार लोणारे, अजित सकाळे, अक्षय गुळवे यांनी वाडीवऱ्हे ते जाधववाडी, देवाची वाडी, वाडीवऱ्हे ते रायगडनगर ( चिमणबारी ), टाकेद म्हैसवळण रस्ता अडवून आंदोलन केले. यावेळी संबंधित गावांच्या ग्रामस्थांनी विनंती केल्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र आठवडाभरात शासनाने यावर मार्ग न काढल्यास कायमस्वरूपी रस्ते बंद करू असा इशारा ठेकेदारांनी दिला. आंदोलनाप्रसंगी वाडीवऱ्हेचे माजी सरपंच रावसाहेब कातोरे, सूरज कातोरे, दिलीप मालुंजकर, दशरथ दिवटे, भीमा मालुंजकर, कचरू शेजवळ, गणपत दिवटे, मनोज खांडबहाले, संतोष गवते, श्रीराम मालुंजकर, प्रवीण मालुंजकर आदी उपस्थित होते.
