चळवळीतील कार्यकर्त्यांनी वाचावे असे पुस्तक – संघर्ष वाटा

डॉ. संजय दामू जाधव यांच्या “संघर्ष वाटा” ह्या बहुचर्चित पुस्तकाचे परीक्षण करताहेत प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे

प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे
shankarborhade@gmail.com

“संघर्ष वाटा” हे डॉ. संजय दामू जाधव यांचे पुस्तक लॉकडाउनच्या काळात वाचून काढले. या पुस्तकात एका दशकाचा लेखकाचा विविधांगी अनुभव शब्दबद्ध झाला आहे. त्या पुस्तकाची आशयसूत्रे, निरीक्षणे पुढीलप्रमाणे मांडता येतात.
“संघर्ष वाटा” ही लेखकाची रुढार्थाने आत्मकथा नाही, असे रावसाहेब कसबे यांनी म्हटले आहे. त्याचे कारण या पुस्तकाला विविधांगी पदर आहेत. डॉ. जाधव हे हाडाचे डॉक्टर आहेत. अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी जे यश संपादन केले आणि त्यासाठी जो संघर्ष केला त्याचे चित्रण या पुस्तकात वाचायला मिळते. त्यातून लेखकाची धडपड दिसून येते. एका सालदाराच्या मुलाने एमबीबीएसनंतर अस्थिरोग तज्ज्ञ हा अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण करून या क्षेत्रात पाऊल ठेवले; हेच मोठे यश होते. त्याचबरोबर स्वतःची स्वतंत्र वाटचाल डॉक्टर करताना दिसून येतात. त्यांचे पुण्यातील दिवस, ती धडपड, प्रॅक्टिस आणि स्थैर्य मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे चित्रण या पुस्तकात वाचायला मिळते. त्यानंतर डॉक्टरांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेऊन नाशिककडे वाटचाल केली. त्या वाटचालीतील वाटा-वळणे आपल्या लक्षात येतात. डॉक्टरांनी स्वतःच्या सुसज्ज अद्ययावत हॉस्पिटलकडे वाटचाल करताना त्यांच्या वाटेत आलेले विविध गतिरोध त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. हाडवैद्य म्हणून त्यांनी नावलौकिक संपादन केला. त्यातून त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल उभे राहिले. त्यासाठी त्यांना काडी-काडी जमा करावी लागली. कधीकधी कर्ज देणाऱ्या पतसंस्थांनीसुद्धा डॉक्टरांना आवश्यक ते सहाय्य केले नाही. तरीसुद्धा नाउमेद न होता त्यांनी आपली वाटचाल केली, याचा लेखाजोखा “संघर्ष वाटा” या पुस्तकात मांडला आहे.
डॉ. संजय दामू जाधव यांनी दीर्घकाळ मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. त्यापाठीमागे अध्यापनाच्या प्रेरणेबरोबरच आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. त्यासाठी पहाटे चारपासून त्यांचा दिनक्रम सुरू होत असे. स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नियोजित शस्त्रक्रिया करून डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जात असत. त्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायात लक्ष घालीत असत. त्यापाठीमागे असणारी नायकाची वेगळी दृष्टी आपल्या लक्षात येते. या नोकरीतही त्यांना अनेक स्थलांतरे करावी लागली. थेट नोकरीसाठी मुंबईपर्यंत जाऊन डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा बजावलेली दिसून येते. नाशिक-मुंबई-नाशिक असा खडतर प्रवास त्यांनी काही काळ केला. आजही ते या क्षेत्रात सक्रिय आहेत. “संघर्ष वाटा” या पुस्तकात नोकरी करताना कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे चित्रण लेखकाने केले आहे.
डॉ. संजय दामू जाधव यांनी जातीय मानसिकतेचा अनुभव “संघर्ष वाटा” या पुस्तकात मांडला आहे. त्यातून त्यांची समाजाप्रति असणारी आस्था स्पष्ट होत जाते. जातजाणिवेचे पदर त्यांनी मांडले आहेत. त्यात त्यांचा दुहेरी संघर्ष दिसून येतो. दया पवार यांच्या ‘एका झाडाने किती टकरावे’ या ओळीचा प्रत्यय हे पुस्तक वाचत असताना येत राहतो. एका बाजूला अन्य जाती आणि दुसऱ्या बाजूला स्वसमाज असा हा दुहेरी संघर्ष डॉक्टरांना करावा लागतो. कधीकधी ते असा संघर्ष अंगावर घेताना दिसून येतात.
दलित राजकारणाचे ताणेबाणे “संघर्ष वाटा”मध्ये येतात. डॉ. संजय दामू जाधव हे प्रथम साम्यवादी विचाराकडे आकर्षित होतात. त्यातून राजकारण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पुण्यात शिकत असताना अनेक विद्यार्थी आंदोलनांत ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना विद्यार्थिदशेतच चळवळीचे वारे लागल्याचे स्पष्ट होते. पुढील काळात साम्यवादी राजकारणात जातप्रभावाचा अनुभव त्यांना येत जातो. त्यातून कम्युनिस्ट चळवळीतील राजकारणापासून ते बाजूला जातात. मतभेद होत असले तरी या काळातील अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झालेले दिसून येतात. मतभेद झाले तरी मनभेद न होता हे ऋणानुबंध चरित्रनायकाने जपले आहेत, असे आपल्याला दिसून येते.
दलितांचे राजकारण करताना त्यांनी अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची आणि राजकारणाची कास धरलेली दिसून येते. अँड. आंबेडकर हे व्यापक राजकारण करतात; असा त्यांचा अनुभव आणि निरीक्षण आहे. आपली राजकारणातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी गजानन माधव मुक्तिबोध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीचे मत हे राजकीय असते; असे आपल्याला दिसून येते. डॉ. जाधव राजकारणात सक्रिय होतात. त्या वाटचालीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला आहे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर संपर्क ठेवला. कार्यकर्ते जोडले. त्यांचे प्रशिक्षण घेतले. विविध निवडणुका जवळून पाहिल्या आणि स्वतःही निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव घेतला. त्यात त्यांना अपेक्षित यश आले नसले तरी त्यातून त्यांना बरेच काही अनुभवायला, शिकायला मिळाले; असे दिसून येते.  *देवळाली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंबंधीचा अनुभव त्यांनी विस्ताराने मांडला आहे. या मतदारसंघातील मतदार, त्यांची जातीय मानसिकता आणि एकमेव अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या मतदार संघातील उमेदवारीसाठी चाललेली दलित पुढाऱ्यांची चढाओढ याचे चित्रण त्यांनी केले आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांच्या मानसिकतेची झाडाझडती ते घेतात. हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर येथे एक अपवाद वगळता नवबौद्ध उमेदवार विजयी होऊ शकला नाही. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भिकचंद दोंदे हे एकमेव बौद्ध आमदार विजयी झालेले दिसतात. पुढील काळात बौद्ध उमेदवाराला बाजूला ठेवलेले दिसून येते. याविषयी डॉ. जाधव यांचे निरीक्षण वाचण्यासारखे आहे. आंबेडकरी राजकारणाचे ताणेबाणे त्यांनी आपल्या विवेचनात मांडले आहेत.
“संघर्ष वाटा” या पुस्तकात दलितांच्या सामाजिक चळवळी आणि राजकारण याची चर्चा केलेली दिसून येते.ही चर्चा संदर्भासाठी येत असली तरी मला या पुस्तकाचे ते सौष्ठव असल्याचे जाणवत राहिले. दलित चळवळींसंबंधी अनेक दुर्मीळ संदर्भ या पुस्तकात जागोजागी आलेले आहेत. गोपाळबाबा वलंगकर, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातील अनेक दुर्मीळ प्रसंगांचे दाखले या पुस्तकात दिलेले आहेत. या  संदर्भामुळे “संघर्ष वाटा” हे सामाजिक पुस्तक चळवळीचा पट मांडताना दिसून येते.
“संघर्ष वाटा”मध्ये अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. त्या नाशिक या केंद्रात सक्रिय असल्याने अनेकांना त्यांचा परिचय आहे. या पुस्तकात आलेल्या व्यक्तींची खासियत, अनुभव लेखकाने नोंदविला आहे. ही नोंद करताना लेखकाच्या विनम्रपणाचा अनुभव येत राहतो. कविवर्य नारायण सुर्वे, यशवंत मनोहर अशा दिग्गजांच्या अनुभवाच्या नोंदी डॉ. संजय जाधव यांनी केल्या आहेत. डॉ. शांताबाई दाणी यांच्या जीवन कार्याविषयीची आस्था या लेखनात प्रकट झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र या संस्थेशी ते कसे जोडले गेले; याचा अनुभव त्यांनी मांडला आहे. करुणासागर पगारे, युवराज बावा यांचेविषयीचे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आपले अनुभव व निरीक्षणे लेखकाने मांडली आहेत. आपल्या वाटचालीत भेटलेल्या अनेक कार्यकर्त्यांविषयी डॉ. जाधव यांनी कृतज्ञताभाव ठेवून लिहिले आहे.
वृत्तपत्र आणि साहित्य ही चळवळीची साधने आहेत. या दोन्ही साधनांचा उपयोग डॉ. जाधव केलेला दिसून येतो. “शांतीपर्व” हे त्यांनी पदरमोड करून चालविलेले मासिक.  मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अशी अनेक वैचारिक प्रेरणेने निघालेली नियतकालिके दीर्घकाळ चालली नसल्याचे पाहायला मिळते. “शांतीपर्व” चालवताना जाहिरातीचा कोणताच विचार त्यांनी केला नाही. रंजनपर मासिके जाहिरातीच्या बळावर दीर्घकाळ चालतात. वैचारिक नियतकालिकांचे तसे नसते. त्यामुळे “शांतीपर्व” त्यांनी पदरमोड करून चालविले आणि महाराष्ट्रभर पोहोचविले. त्याचवेळी ललित लेखनाचा अनुभवही त्यांनी घेतला. त्यातून कथा, आत्मकथा, कविता, संक्षिप्त चरित्र या वाङमय प्रकारातील लेखन केले. त्यांनी  “कथा प्रश्नांच्या” लिहिल्या. “निखाऱ्यांचा उठाव” हा त्यांचा कवितासंग्रह. कर्मवीर दादासाहेब गायकवाड, कर्मयोगिनी शांताबाई दाणी यांच्याविषयीच्या पुस्तिका लिहून प्रसिद्ध केल्या. त्याच वेळी  “धडपड सालदाराच्या पोराची” हे आत्मकथनही प्रसिद्ध केले. “आपण जे बोलतो, लिहून काढतो, त्यातून समाजामध्ये बदल घडू शकतो, अशा सर्व मौखिक आणि लिखित गोष्टींना साहित्य म्हटले जाते” अशी एक साहित्याची व्याख्या डॉ.जाधव यांनी केली आहे. समाज परिवर्तनासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी साहित्यनिर्मिती हे त्यांचे प्रयोजन “संघर्ष वाटा” वाचत असताना जाणवत राहते. त्यामुळे ते विविध साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होतात आणि आपला साहित्यविचार आग्रहाने मांडत राहतात, हे वाचताना लक्षात येते.
“संघर्ष वाटा” ही एका हाडाच्या डॉक्टरची आत्मकथा आहे. तशीच सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्याचीसुद्धा आत्मकथा आहे. त्याचबरोबर साहित्याच्या प्रांतात योगदान देणाऱ्या एका लेखकाची आत्मकथा आहे. या आत्मकथेचा नायक समाज परिवर्तनासाठी लढताना दिसून येतो. त्यासाठी ठोस, आग्रही भूमिका तो मांडतो. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या तुकोक्तीचा प्रत्यय ही आत्मकथा वाचत असताना येतो.
एका दशकाची वाटचाल “संघर्ष वाटा” या पुस्तकात लेखकाने मांडली आहे. निवेदनात सहजता आहे. शिवाय आपले स्वतःचे दृष्टिकोन कोणतीच लपवाछपवी न करता लेखकाने मांडले आहेत. या पुस्तकाचे संपादन झाले असते तर साहित्यकृती म्हणून तिला एक दर्जा प्राप्त झाला असता.  मात्र संपादनाचा अभाव आणि ठिकठिकाणी आढळणारे मुद्रणदोष यामुळे संघर्ष वाटांना उणेपणा येतो.

Similar Posts

Comments

  1. avatar
    SIDDHARTH SAPKALE says:

    खुपच छान विश्लेषण…. संघर्ष वाटा… !

Leave a Reply

error: Content is protected !!