
इगतपुरीनामा न्यूज – ‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ असे सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सोमवारी २८ एप्रिलला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानिमित्ताने सोमवारी इगतपुरी तहसीलदार कार्यालयातर्फे तुळसाई लॉन्स, साकुर फाटा येथे सेवा हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता सेवा हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यालक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक राजकीय व इतर क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवा पारदर्शक गतिमान व विविध कालमर्यादित देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला असून २८ एप्रिल २०१५ पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादित सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.
नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध दाखल्यांची आवश्यकता असते. कधी पाल्याच्या शालेय, महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्न, अधिवास, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व, शेतकरी, विवाह नोंदणी, दिव्यांग दाखला, जन्म- मृत्यू नोंद दाखल्यासह विविध दाखल्यांची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागत असे. त्यात बराच कालावधी जात असे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवश्यक सेवा ऑनलाइन आणि विहित केलेल्या कालावधीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला. या अधिनियमाची अंमलबजावणी २८ एप्रिल २०१५ पासून सुरू झाली. या कायद्यांतर्गत ‘आपले सरकार’ पोर्टलवर आतापर्यंत ३८ विभागांच्या ९६९ सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा एक क्रांतिकारी कायदा असून त्यामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत विविध वैशिष्ट्ये आहेत. लोकसेवा देताना पारदर्शकता, उत्तरदायीत्व, कालबद्धता, कार्यक्षमता या बाबी साध्य करण्याचा प्रयत्न या कायद्यातून झाला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकसेवा वितरणामध्ये सक्षमता व पारदर्शकतेच्या संस्कृतीस चालना देण्यावर या कायद्याचा भर राहिला आहे. ह्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व जनसामान्य माणसात जनजागृती करणेकामी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.