कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील खडकेद, इंदोरे गावात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा व विद्यार्थिनींचा जीव मेटाकुटीला

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील खडकेद, इंदोरे गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात हे गाव आहे. गावचे मुख्य जलस्रोत विहीर व हातपंप पूर्णतः आटल्याने इथल्या नागरिकांपुढे पाण्यासाठी गंभीर संकट निर्माण झाले आहे. इगतपुरी पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थ बोलतात. महिलांना आणि मुलींना २ किमी पायपीट करत टेकडी उतरून स्मशानभूमीजवळ हातपंपाचे पाणी भरावे लागते. मात्र, आता त्या हातपंपाचे पाणी कमी पडू लागले असून एक हंडा पाणी भरण्यास २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत आहे. पाण्याची धार खूप कामी असल्याने अर्धा हंडा भरल्यानंतर पाणी थांबते व काही वेळ थांबूनच पुढे भरता येते. या परिस्थितीमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थकवा, दम लागणे आणि उन्हामध्ये तासनतास उभे असल्यामुळे आरोग्यावर परिणाम झाला आहे. विद्यार्थिनींचे शाळेचं शिक्षण बुडत असून महिलांचा रोजगारही यामुळे अडचणीत आला आहे. आजूबाजूला डोंगर व जंगल असल्यामुळे पाणी आणताना जंगली श्वापदांची भीती देखील महिलांना जाणवते. ही केवळ पाण्याची समस्या नाही, तर ती आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता आणि विकास यांच्याशी निगडित एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. ग्रतातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

error: Content is protected !!