आनंदतरंग फाऊंडेशनच्या ‘हॅप्पी बर्थडे’ बालनाट्याने पटकावला राज्यस्तरावर तिसरा क्रमांक : शिक्षण, स्वच्छता, सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या बालनाट्याचा बोलबाला

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे निर्मित “हॅप्पी बर्थ डे” या बालनाट्याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ह्या बालनाट्याला नाशिक जिल्ह्यातून प्रथम तर विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला होता. बालनाट्य लेखनाचे प्रथम पारितोषिक संकेत पगारे, दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक सतीश वराडे, उत्कृष्ट अभिनयाबद्दल रौप्य पदक पुरुष हर्षदीप अहिरराव तर उत्कृष्ट रौप्य पदक स्त्री प्रांजल सोनवणे यांना मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. आनंदतरंग ह्या लोककलेतून लोकशिक्षण देणाऱ्या संस्थेची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्काराने संस्थापक सन्मानित असून त्यांच्या बालनाट्याची राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत निवड झाली होती. 

हे नाटक ग्रामीण भागातील शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकते. गावातून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यात लोक परसाला जात असतात. त्यामुळे रोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हॅपी बर्थडे होत असतो. गाव अस्वच्छ असल्याने शाळेतल्या शिक्षिका गाव सोडण्याचा विचार करतात. मुलांचा त्यांच्यावर खूप जीव असतो. मुलं त्यांना थांबवतात आणि गाव स्वच्छ करण्याचा निर्धार करतात. ही मुलं आपल्या निरागस पण जिद्दी स्वभावाने कधी विनवणी करून, कधी हट्ट धरून, तर कधी डोळ्यांत अश्रू आणून आपल्या कुटुंबीयांना गावाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करतात.पण त्यात त्यांना अपयश येते.. लांडगा आला रे आला ह्या गोष्टीप्रमाणे गावात वाघ आणला जातो. शेवटी वाघ शिरल्याची अफवा पसरल्यावर लोक घाबरतात आणि शौचालयांचा वापर सुरू करतात. अखेर, मुलांच्या प्रयत्नांमुळे गाव स्वच्छ होते, आणि बाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर भेट मिळते.

१२ ते १८ फेब्रुवारी कालावधीत रत्नागिरीत झालेल्या अंतिम फेरीत ३२ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून संतोष आबाळे, गिरीश भुतकर, राजेश जाधव, संग्राम भालकर, राधिका देशपांडे यांनी काम पाहिले. या बाल नाट्याचे नेपथ्य पायल जाधव, दुर्गेश गायकर, संगीत रोहित सरोदे, अविनाश सांबरे, प्रकाश योजना कृतार्थ कन्सारा, रंगभूषा हिंदवी आगळे, श्रुतिका करंजकर, वेशभूषा वैभव पाटील, रंगमंच सहाय्यक सागर गवळी, सानिका पवार, दुर्गेश पाटील, आदित्य भानोसे, ओम जाधव यांनी केले. विशेष सहकार्य शाहीर उत्तम गायकर, राजू गायकवाड, अभिजीत कोळेकर, अशोक मदगे यांचे लाभले. यातील बाल म्हणून सौरभ क्षीरसागर, हर्षदीप अहिरराव, स्वरा शिरसाट, प्रांजल सोनवणे, परिक्षीत नागरे, आशुतोष चव्हाण, चेतन मुर्तडक, पियूष जाधव, साई कर्पे यांनी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व केले. सर्व स्तरातुन कलावंतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Similar Posts

error: Content is protected !!