जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांची वसुली थांबवावी : शेतकरी संघटनेचे सहकारमंत्री अतुल सावे यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 1

नाशिक जिल्हा शेतकरी व शेतकरी संघटना ( स्व. शरद जोशी प्रणीत ) जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्री अतुल सावे यांना जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांची वसुली या विषयाबाबत निवेदन देण्यात आले. नोटबंदी, कोरोना आणि सततच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. सोसायटी व बँका कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून लिलाव करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागत आहे. शासनाने संकटग्रस्त शेतकऱ्यांची कोर्ट वसुलीच्या माध्यमातून होणारी कर्जवसूली थांबवावी. जिल्हा बँक मुद्दलाच्या ४ पट व्याज लावत असून राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्याजात सूट देऊन एकरकमी कर्ज वसुली करावी. आपण स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करील असे निवेदनात नमूद आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, प्रदीप पवार, एकनाथ धनवटे, भिमराव बोराडे, बाळासाहेब गायकवाड, सुनील भंडारे, आनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!