इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
महिंद्रा कंपनी इगतपुरी शाखा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल धोरणांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांच्या संकल्पनेतून दारणामाई महिला बचत गट केंद्राचे उदघाटन महिंद्रा इगतपुरीचे प्रशासकीय व्यवस्थापक जयंत इंगळे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. महिंद्रा कंपनीच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त कुरुंगवाडी येथील महिला शेतकऱ्यांनी तयार केलेली उत्पादने वरई लाडू, वरई चिक्की, भगर, नागली लाडू, डांगी गायीचे गावरान तूप, खवा व रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या. उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्री साखळ्या आणि कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे अशी ग्वाही मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी यावेळी दिली. केंद्रामध्ये ग्राहकांनी तुडूंब गर्दी करत खरेदीला जोरदार प्रतिसाद दिला. या विक्री केंद्रामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी गट यांनी बाजारपेठेत मागणी असलेल्या उत्पादनाची थेट विक्री करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी केले. विक्री केंद्राला शेती उपकरणे विभाग मुंबईचे अध्यक्ष हेमंत सिक्का, महाव्यवस्थापक, इगतपुरी शाखा राजेश खानोलकर यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाची चव चाखत पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.