इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने ट्रॅक्टर जमा करून त्याचा जाहीर लिलाव करण्याचा घाट घातला आहे. त्याला शेतकरी संघर्ष संघटना कडाडून विरोध करून लिलाव हानुन पाडणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांनी दिला आहे. आताच अनेक बड्या धेंडांनी घोटाळे केलेले असताना सहकार विभागाने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असताना ती वसुली न करता सामान्य शेतकऱ्यांवर मात्र अन्याय केला जात आहे. शेतकरी अगोदरच अडचणीत असताना कोरोनात जगाला जगवणारा शेतकऱ्यांना जिल्हा बँक सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे .शेतकरी मागच्या 2/3 वर्षात कोरोना आणि नैसर्गिक अडचणींमुळे बँकेची थकबाकी भरू शकलेला नाही. परंतु शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत असतानाच कुठलीही सवलत न देता थेट लिलाव करण्याचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस भाग पाडण्याचे काम बँक प्रशासन करत आहे. राज्यभर कोरोनाचे निर्बंध असताना तुम्ही पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांनी दिला आहे