
इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
परदेशवाडी उपकेंद्रातंर्गत बेलगाव तऱ्हाळे फिडर सातत्याने बंद राहत असल्याने शेतकरी व व्यावसायिक बांधव वैतागले आहेत. सध्या उष्णता वाढल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. त्यातच महवितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून पावसाळा संपून सुद्धा सातत्याने वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत वीज गायब झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान होत आहे. आधी अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे खूप नुकसान झाले आणि आता वीज नसल्याने नुकसान होत आहे. याला महावितरण जबाबदार आहे असा आरोप बेलगाव तऱ्हाळे सोसायटीचे चेअरमन समाधान वारुंगसे यांनी केला आहे.
ह्या भागातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून वरिष्ठ स्तरावरून अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण जीर्ण झालेले पोल व वितरण व्यवस्था बदलण्याची गरज असून अधिकारी फक्त टोलवाटोलवी करत असल्याची सध्या परिस्थिती आहे असेही ते म्हणाले. महवितरण कंपनी बिलवसुलीची सक्ती ज्या पद्धतीने करते त्या बदल्यात मात्र विद्युत पुरवठा सुरळीत ठेवत नाही. असा आक्षेप त्यांच्यावर शेतकरी बांधव घेत आहेत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा चेअरमन समाधान वारूंगसे यांनी दिला आहे.