तीन जनसेवक, समाजसेवकांनी भागवली अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांची तहान : वन विभागाचे मिळाले सहाय्य

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथील आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी उपलब्ध होणारे पाणी अपुरे पडत असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांसमोर “स्वतः प्यायचे की जनावरांना पाजायचे?” असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत समजल्यानंतर टिटोलीचे समाजसेवक तथा पाणीशुद्धीकरण प्रकल्पाचे मालक मोहन बोंडे यांनी पुढाकार घेत खैरेवाडीतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांनी इगतपुरीचे नगरसेवक भूषण जाधव यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन भूषण जाधव यांनी नगरसेवक राज जावरे आणि रोहिदास डावखर यांना सोबत घेत मदतीचा निर्णय घेतला.

मोहन बोंडे यांच्या सहकार्याने तब्बल ४५ जार शुद्ध पिण्याचे पाणी घेऊन ही टीम खैरेवाडीच्या दिशेने रवाना झाली. मात्र गाव अतिदुर्गम भागात असल्याने तेथील रस्त्यांची अचूक माहिती नसल्याने वनरक्षक कैलास पोटिंदे, अश्विनी पाटील यांनी मोलाचे सहकार्य करत पथकाला सुरक्षितपणे गावापर्यंत पोहोचवले. खैरेवाडीत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचताच आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. समाजसेवक मोहन बोंडे, नगरसेवक भूषण जाधव, राज जावरे, रोहिदास डावखर, वनरक्षक कैलास पोटिंदे, अश्विनी पाटील, इंद्रजीत गुप्त, वनमजूर बाळू भुरबुडे यांनी स्वतः आदिवासी बांधवांचे हंडे, कळश्या आणि पाण्याच्या भांड्यांमध्ये पाणी भरून दिले. विशेष म्हणजे, एकादशीच्या पुण्यपर्वावर पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्याने आदिवासी माता भगिनींनी सर्व मदतकर्त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून सर्वांच्या मनाला समाधान मिळाले. भविष्यातही अशाच प्रकारे मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले. सामाजिक बांधिलकी जपलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पहा व्हिडीओ बातमी https://youtube.com/shorts/XMq9I32xxUo?si=J8m0jbudLKPyqRsc

error: Content is protected !!