
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
ग्रामीण भागात बचतगट संकल्पना संजीवनी ठरली आहे. अडचणीच्या काळात सुलभ कर्ज उपलब्ध झाल्यामुळे स्वंयरोजगाराची महिलांना प्रेरणा मिळाली. म्हणून बचत गटांकडे आता एका नव्या व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे असे प्रतिपादन नगरसेविका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी केले. बचतगटांना मार्गदर्शन’ उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सक्षमा वस्तीस्तरीय संघाच्या चेअरमन सुरेखा सोनवणे उपस्थित होत्या.
मराठा विद्या प्रसारक समाज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर आणि बचतगटांना मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत शहरातील समाजमंदिरात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व प्रतिमापूजनाने मान्यवरांच्या हस्ते झाली. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नीता पुणतांबेकर ‘बचतगटाचे व्यवस्थापन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, बचत गटांमार्फत महिलांना बचतगटाचे महत्त्व समजले असून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास होऊन जबाबदारीची जाणीव वाढीस लागली आहे. कार्यक्रमाला बचत गटातील 30 महिला, आजी माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. शाश्वती निरभवणे यांनी, आभार प्रदर्शन प्रा. हर्षाली कोठावदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.