
इगतपुरीनामा न्यूज, दि. 26
साहित्य संमेलन मोठ्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील ही चळवळ रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्ष साहित्य संमेलन भरवत आहेत. खरोखर हे कौतुकास्पद आहे असे जयप्रकाश जातेगावकर यांनी म्हणाले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात ते संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
प्रथम टाळ मृदुंगांच्या गजरात, लेझीमच्या तालात ग्रंथदिंडीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर दिप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. २६/११ च्या हल्यात शहीद झालेले जवान, निष्पाप नागरिक,आणि अनेक साहित्यिक, इतर मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढे बोलतांना त्यांनी साहित्य चळवळ अशीच सुरु राहावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सर्व साहित्यिकांना ९४ व्या साहित्य समेलनाचे निमंत्रक म्हणून निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी व साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांना निमंत्रणपत्रिका देवून आग्रहाचे निमंत्रण दिले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर, आमदार हिरामण खोसकर, कवी व गीतकार प्रकाश होळकर, मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, मावळते अध्यक्ष विवेक उगलमुगले, कवी तुकाराम धांडे, विलास गोवर्धने, प्रा. प्रशांत पाटील, वैशाली आडके, सुभाष सबनीस, अलका दराडे, प्रवीण जोधळे, प्रा. डॉ. पी. आर. भाबड, मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, नरेंद्र पाटील, अलका कुलकर्णी, प्रा. आशा पाटील, बाळासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.
माणसाने माणसाजवळ आपुलकीने जावे हे साहित्य संस्कृतीचे मूलतत्व आहे. सर्व भिंती तोडून साहित्य निर्माण व्हावे असे जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी थोडक्यात बोलतांना सांगितले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना
विश्वास देवकर यानी इथल्या मातीत या साहित्य संमेलनाच्या रूपाने तुकाराम धांडे सारखे कवी निर्माण झाले आहेत. माझ्या वतीने मी माझ्या लेखनातून आणखी साहित्यिक निर्माण व्हावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असे सांगितले. प्रथम सत्राचे अध्यक्ष भाऊसाहेब खातळे यांनी बोलतांना अनेक वर्षापासून तालुक्याच्या विविध भागात निसर्गाच्या सानिध्यात पार पडत असलेल्या या साहित्य संमेलानाने अनेक नामवंत साहित्यिक निर्माण झाले आहे. संस्कृती जपण्याचे काम हे साहित्य संमेलन करत आले आहे. ते असेच अविरत सुरु राहावे यासाठी सतत मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी प्रशांत पाटील,प्रकाश होळकर, प्राचार्य भाबड यांनीही मनोगत व्यक्त केले. द्वितीय सत्रांत ग्रामीण साहित्य संधी आणि आव्हाने तसेच साहित्यातून व्यक्त होणारी स्त्री या विषयावर परिसंवाद झाला. संत साहित्यातील चिरंतन मूल्य यावर व्याख्यान झाले. शेवटी निमंत्रित कवींचे कवि संमेलन पार पडले. उद्या पुन्हा विविध कार्यक्रम, अध्यक्षीय भाषण आणि खुले कविसंमेलन होणार आहे. ज्ञानेश्वर गुळवे, प्रा. देवीदास गिरी, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, रवींद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.