प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पीक पाहणीची अचुक नोंद होण्यासाठी ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिकपेरा’ ही मोहिम शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी मुदतवाढही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यात जास्तीतजास्त सहभाग घेऊन लवकरात लवकर आपली पिकपाहणी करावी असे आवाहन वाडीवऱ्हे मंडळातील मुकणेच्या तलाठी सुवर्णा गांगुर्डे यांनी केले आहे.
जमीन महसुल कायद्यानुसार सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अंदाज लावणे सोपे होणे, शिवाय या पिकपाहणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी उपयोग होणार आहे. शासनाकडून एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर झाल्यास आपली पिकपाहणी न झाल्यास आपले क्षेत्राची नोंद पडीक राहून आपण त्या आर्थिक मदतीपासून वंचीत राहू नये तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजना, पीककर्ज मिळण्यास पिकपाहणीच्या नोंदीचा फायदा होणार आहे.
पिकपाहणी अँपच्या आधारे शेतकऱ्यांना पिकाची व शेतीची माहिती भरणे सुलभ आहे. क्षेत्रानुसार पीक लागवडीचे क्षेत्र किती हे शासनाच्या दप्तरी नोंद होण्यासही मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘ई पीक पाहणी’ हे अँप डाउनलोड करून त्याआधारे आपल्या शेतीची व पिकाची नोंद करून सदर शेतीचा फोटो त्यात भरून लवकरात लवकर आपली पिकपाहणी करावी असे आवाहन तलाठी सुवर्णा गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.