जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन दरमहा १ ते ५ दरम्यान करावे : पंचायत राज समितीला संघटनेकडून साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दरमहा १ ते ५ तारखेच्या दरम्यान व्हावे. निवृत्तीवेतन धारकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीला निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समितीचे अध्यक्ष ना. संजय रायमुलकर साहेब यांची भेट घेऊन सर्वांगीण माहिती दिली. निवेदनात नमूद मागणीवर निश्चित विचार करण्याचे आश्वासन समितीच्या वतीने संघटनेला देण्यात आले. राज्यात सगळीकडे राज्य सरकारी कर्मचारी यांना दरमहा १ तारखेला निवृत्ती वेतन मिळत असते. परंतु जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २० तारखेच्या पुढे पेन्शन मिळत असते. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो. यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा सुरू असून त्यासाठी हे पेन्शन १ ते ५ तारखे दरम्यान करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रवींद्र बापू थेटे, सहकोषाध्यक्ष विजय वानखेडे, संघटक प्रमुख बबनराव भोसले, कार्यकारिणी सदस्य सुभाष कंकरेज, बाळासाहेब पाटील, एम.यु. देशमुख हजर होते.

Leave a Reply

error: Content is protected !!