वैतरणा नगर शासकीय आश्रम शाळेतून ६ विद्यार्थी बेपत्ता 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथील शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळी शाळेतून निघूनही अद्याप घरी पोहोचले नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच धोरणात्मक चर्चेत राहिला आहे. यापूर्वीही एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आश्रम शाळांच्या कमकुवत सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेकदा आवाज उठवण्यात आला होता. मात्र आदिवासी विकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी केला आहे. ह्या आश्रमशाळेतील विद्यार्थी अद्यापही बेड नसल्यामुळे खाली झोपतात. प्रशासन गडचिरोली सारख्या घटनेची वाट पहात आहे का? असा सवालही भगवान मधे यांनी यावेळी केला.

समजलेली माहिती अशी की, हे सहा विद्यार्थी वैतरणा नगर येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असून, ते गुरुवारी सायंकाळी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर वैतरणा येथून देवगाव येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र ठरलेल्या वेळेत मुले घरी न पोहोचल्याने पालकांनी तातडीने शाळेत धाव घेतली. संदीप वारे (इयत्ता पाचवी), राजू बांगारे (इयत्ता सातवी), रवी बांगारे (इयत्ता सातवी), भास्कर बांगारे (इयत्ता सहावी), रस्मा गोरे (इयत्ता सातवी), तेजस वारे (इयत्ता सातवी) अशी बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे आहेत. शाळा आणि घराच्या मार्गावर सध्या शिक्षक आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा अनास्था कारभार पुन्हा एकदा उघडा पडला असून मुले सुखरूप व लवकरात लवकर सापडावीत अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!