
इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा नगर येथील शासकीय आश्रमशाळेतून काल बेपत्ता झालेले सहाही विद्यार्थी रात्री सुखरूप सापडले आहेत. या मुलांच्या सुरक्षित परतण्यामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्गाने सुटकेचा श्वास सोडला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. काल दुपारच्या्क दरम्यान हे सहा विद्यार्थी अचानक शाळेतून बेपत्ता झाले होते. त्यामुळे शाळा परिसर आणि पालकांमध्ये खळबळ उडाली होती. शोध घेतला असता असे समोर आले की, हे विद्यार्थी वाटेतील एका शेतात गेले होते आणि त्यांनी तेथून ऊस तोडून खाल्ला होता. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याने त्यांना रंगेहात पकडले आणि “याबद्दल शाळेत जाऊन तक्रार करेन,” असा दम दिला. शेतकऱ्याच्या या बोलण्याने घाबरून गेलेले विद्यार्थी शाळेत परतण्यास आणि घरी जाण्यास कचरत होते व भीतीपोटी इकडेतिकडे लपून बसले होते. रात्री उशिरा हे विद्यार्थी मिळून आल्यानंतर शिक्षकांनी व पालकांनी त्यांची विचारपूस केली व त्यांची भीती दूर केली. आज रक्षाबंधन सण असल्याने, प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना अत्यंत आनंदाच्या वातावरणात त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. मुलांची घरवापसी झाल्याने पालकांनीही प्रशासनाचे आभार मानले आहेत.