
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील यांची निवड केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दत्ता पाटील यांनी “खेळीया, बगळ्या बगळ्या कवडी दे, किनाऱ्यावरचा कालपुरुष, डेटिंग विथ रेन, मध्यम पदलोपी, कृष्णविवर, स्ट्रॉबेरी, नेब्यूला, गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, कलगीतुरा, दगड आणि माती, इथेच टाका तंबू” ही प्रायोगिक १३ नाटके लिहिली असून ती रंगमंचावरही तुफान गाजत आहेत. शिवाय “सेलिब्रेशन, म्यनिया सयामी, साडे माडे शंभर, ब्लॅक आउट, सिटी लाइट्स, कस्टमर केअर, सोळाशे पन्नास” या आठ एकांकिका प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हंडाभर चांदण्या या संहितेला अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा नाट्य सन्मान पुरस्कार मिळालेला असून या नाटकाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीए मराठी प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. अमळनेर आणि मुंबईच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही हंडाभर चांदण्याची संहिता समाविष्ट आहे. त्याच प्रकारे दगड आणि माती मुंबई विद्यापीठात व तो राजहंस एक ही नाट्यसंहिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. तो राजहंस एक या नाटकाला सर्वोत्कृष्ट लेखनाचा झी गौरव पुरस्कार मिळालेला असून दिल्ली व मुंबईच्या नाट्य महोत्सवासाठी निवड झाली. कलगीतुरा, दगड आणि माती, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक या चारही नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रासह दिल्ली, कोलकाता येथील नाट्य महोत्सवात तुफान लोकप्रिय होत आहेत. अनेक नाटकांना व एकांकीकांना शासकीय व अनेक प्रतिष्ठित संस्थांचे मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या ‘हंडाभर चांदण्या ‘या नाटकाच्या माध्यमातून ६ लाख रुपयाचा निधी उभारून सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे तोरंगण या आदिवासी गावाचा पाणीप्रश्न कायमचा सोडवला आहे. या नाटकाला मटा सन्मान पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांनी २०१७ मध्ये सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थानही भुषविले असून अनेक नाट्यलेखन शिबिरात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या निवडीबद्दल कला व साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. हे ग्रामीण साहित्य संमेलन रविवार २२ फेब्रुवारीला ग्रामसेवक भवन, बाजीराव नगर, तिडके कॉलनी, नाशिक येथे सकाळी ९ ते ५.३० या कालावधीत तीन सत्रात संपन्न होणार आहे. यामध्ये सर्व साहित्य रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झनकर, रवींद्र पाटील, हिरामण शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते.