
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्र असलेल्या अंबई गावात वादळी वारे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे २ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे उघड्यावर आलेल्या पीडित कुटुंबांपैकी एका कुटुंबाला शेजारील घरात तातडीने सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांनी स्वतः भर पावसात, प्रतिकूल परिस्थितीत अंबई गावाला भेट दिली. त्यांनी नुकसान झालेल्या दोन्ही घरांची आणि पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची आस्थेने विचारपूस केली. संकटकाळात धीर देत शासनाकडून तातडीने सर्वतोपरी मदत आणि योग्य ते संपूर्ण सहकार्य मिळवून देण्याचा शब्द तहसीलदार गणेश जाधव यांनी यावेळी पीडित कुटुंबांना दिला. प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांमधील संवेदनशील दुवा साधत, भर पावसातही आदिवासी कुटुंबांच्या मदतीसाठी तहसीलदार गणेश जाधव यांनी घेतलेल्या या परिश्रमांमुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
आदिवासी नागरिकांच्या भयानक संकटसमयी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव हे तातडीने मदतीला धावून आल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी तहसीलदार गणेश जाधव यांच्या संवेदनशील व कर्तव्यतत्पर भूमिकेचे विशेष कौतुक केले असून, त्यांच्या या कार्याला सॅल्यूट केला आहे. आगामी काळातही आदिवासी नागरिक आणि सामान्य नागरिकांची कामे व्हावीत यासाठी प्रशासन गतिमान करावे अशी अपेक्षा लकीभाऊ जाधव यांनी व्यक्त केली.