
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशानुसार इगतपुरी तालुक्यात प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. यामध्ये नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, कोणत्याही प्रकारची कसूर खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके यांनीही उपस्थितांना उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार इगतपुरी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि आश्रमशाळांना उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनांनी याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुट्टी असली तरी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील धबधबे, पर्यटन स्थळे, ट्रेकिंग पॉईंट्स आणि नदीकाठच्या परिसरात होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ‘नो टूरिस्ट पॉलिसी’ लागू करण्यात आली आहे. पोलीस, महसूल आणि वन विभागाने समन्वय साधून पर्यटन स्थळांच्या प्रवेशद्वारांवर बॅरिकेडिंग करून पर्यटकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालावी असे निर्देश देण्यात आले आहेत. यासह आपत्तीविषयक अफवा पसरवू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन नागरिकांसाठी सक्रिय असल्याने सर्वांनी सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
सखल भाग आणि नदीकाठच्या धोकादायक पुलांची तपासणी करून तेथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. इगतपुरी व कसारा घाट परिसरातील भूस्खलनाच्या संभाव्य स्थळांची सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्त पाहणी करावी. धोकादायक वस्तीतील नागरिकांना ‘अर्ली वॉर्निंग’ देऊन सतर्क करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून, तालुक्यातील सर्व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, नगरपरिषद कर्मचारी व आरोग्य सेवकांना पुढील ४८ तास मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या परवानगीशिवाय कोणालाही मुख्यालय सोडता येणार नाही आणि सर्वांचे मोबाईल फोन २४ तास कार्यरत असणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखून नियंत्रण कक्षाशी २४ तास संपर्कात राहावे, असे आदेश तहसीलदार अभिजित बारवकर यांनी बैठकीच्या शेवटी दिले. या परिस्थितीमध्ये आपत्कालीन मदतीसाठी किंवा माहितीसाठी नागरिकांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके यांनी केले आहे.