
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांच्या खालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने अनेक घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनीची धूप झाल्यामुळे घरांना धोका निर्माण झाल्याने गावातील सुमारे ८ ते १० कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या कुटुंबांतील जवळपास ३९ नागरिकांना प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडे या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना या घटनेची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांसह ते घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी सूक्ष्म लक्ष घालण्यात आले असून आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, धोकादायक ठरलेल्या घरांची पाहणी करून आवश्यक ती मदत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांनी माध्यमांना सांगितले की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी संकट काळात शहरात भेटी देण्याचे सोंग करतात. मांजरगावात मते मागणारे ते नेते ह्या गावाच्या संकटात सुद्धा सोबत नाहीत. तहसीलदार, पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थ समन्वय साधून आपत्तीचा सामना करीत असल्याचे त्यांनी कौतुक केले.
