
इगतपुरीनामा न्यूज : राज्य मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असला, तरी विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आलेले नाही. हीच बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. इयत्ता ११ वीच्या पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका (Original Marksheet) आणि शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate – LC) सादर करणे सध्या अनिवार्य असणार नाही, असे अधिकृत परिपत्रक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जारी केले आहे.
हमीपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित होणार
सध्या इयत्ता ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, २१ मे २०२६ पासून नियमित फेरी-१ ची सुरुवात झाली आहे. २९ मे २०२६ रोजी या फेरीची गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनिअर कॉलेज) अलॉट झाले आहे, त्यांनी आपला प्रवेश निश्चित करताना मूळ कागदपत्रांऐवजी कनिष्ठ महाविद्यालयाकडे एक हमीपत्र (Undertaking) लिहून देणे आवश्यक आहे.
या हमीपत्रात, “१० वीची मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तो महाविद्यालयात सादर केला जाईल”, असे विद्यार्थ्यांनी लिहून देणे गरजेचे आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांना कडक सूचना
कागदपत्रांभावी कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला जाऊ नये, यासाठी शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि शिक्षण निरीक्षक यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. आपल्या अखत्यारीतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांपर्यंत या सूचना तातडीने पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
⚠️ महत्त्वाची नोद : विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला वेळेत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो, याची जाणीवही शिक्षण विभागाने करून दिली आहे. त्यामुळे कागदपत्रे हाती येताच ती महाविद्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.