
इगतपुरीनामा न्यूज – आदिवासींच्या विरोधात धोरणे राबविणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ घोटी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यस्तरीय रास्तारोको केला. परिषदेकडून यावेळी विविध मागण्यांसाठी उलगुलान मोर्चा काढून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन छेडण्यात आले. आंदोलनापूर्वी मोर्चा काढत बोगस हटाव आदिवासी बचावच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. बोगस हटाव आदिवासी बचाव हा नारा देत आजचे आंदोलन हा ट्रेलर असून शासनाने दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा लकीभाऊ जाधव यांनी दिला. १७ मार्चला आदिवासी मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या निवासस्थानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव म्हणाले की आदिवासींचे आरक्षण वाचवण्यासाठी आज आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला आहे. बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीवर आदिवासी विभागाचा निधी खर्च केला जात आहे. शासनाने ही समिती रद्द करावी, समितीवर आदिवासी विभागाचा निधी खर्च करू नये. आदिवासी समाजाच्या विरोधात धोरणे राबविणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हक्काचे आरक्षण हे संविधानावर चालते. ते कुठल्या हैदराबाद गॅझेटवर चालत नाही असेही ते म्हणाले. लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसील प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवाध्यक्ष गणेश गवळी, आदिवासी नेते किरण खाडम, ज्ञानेश्वर झोले, विजय पोटकुले, सरपंच ढगे, पिंटू सावंत, बाळासाहेब शिंदे, हिरामण कौटे, कृष्णा गोहिरे, किरण पाडेकर, शांताराम भांगे, सरपंच गोविंद सावंत, जीवन भोये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.