नाशिक येथे ३ ऑगस्टला रानभाजी महोत्सव व शेतमाल विक्री केंद्राचा प्रारंभ : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार शुभारंभ

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – नैसर्गिक, पौष्टीक, औषधी गुणधर्माच्या रानभाज्यांचा महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्राचे उदघाटन रविवारी ३ ऑगस्टला सकाळी १० वाजता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नाशिक मधील उंटवाडी रोडवरील रामेतीच्या आवारात होणार असल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी दिली. मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात विविध भाज्यांचा समावेश असतो. जंगल आणि शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यांच्यामध्ये शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्याने त्यावर कीटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही. अशा खाद्य संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्यविषयक महत्व आणि माहिती शहरी नागरिकांना व्हावी, तसेच विक्री व्यवस्था करुन आदिवासी शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा याची जनजागृती करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जुन, जुलैच्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने त्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पावसाळ्यातील रानभाज्यांमध्ये जिल्ह्यातील करवंदे, गुळवेल, कडुकंद, चाईचा मोहोर, सुरण यांचा समावेश होतो. हिरव्या भाज्यांमध्ये तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुडू, घोळ, आळु, खुरसणी, तोंडली, लोथ यांचा समावेश होतो. शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्र हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी एक मजबुत पर्याय ठरणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. त्याचवेळी ग्राहकांना ताजे, आरोग्यदायी अन्न् मिळेल. सामाजिक व आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर ठरणारा शेतमाल विक्री केंद्र रामेती संभाजी चौक, उंटवाडी संस्थेच्या आवारात प्रत्येक शनिवारी सुरु करण्याचे नियोजन आहे. नाशिककरांनी रानभाजी महोत्सव आणि शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्रास भेट द्यावी. रानभाज्या आणि शेतमाल खरेदी करुन आपल्या आहारात समावेश करावा. उपलब्ध रानभाज्यांच्या पाककृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!