इगतपुरी कृषी विभागामार्फत भात लावणी यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक : यंत्रासाठी मिळणार नानाजी देशमुख प्रकल्पातून अनुदानाचा लाभ

इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय भात संशोधन केंद्र, इगतपुरीच्या प्रक्षेत्रावर यंत्रा द्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगणचे शेतकरी शांताराम जाधव यांनी त्यांच्या भात लावणी यंत्राद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना भाताची आवणी करून दाखवली. यावेळी श्री. जाधव यांनी शेतकऱ्यांच्या शंका आणि प्रश्नांना लागवड प्रात्याक्षिकावेळी उत्तरे देऊन समाधान केले. यंत्राद्वारे भात लागवड कशी फायदेशीर आहे हे त्यांनी यावेळी उदाहरणासह दाखवून दिले. प्रात्याक्षिक कार्यक्रमानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्र येथील सभागृहात प्रकल्प संचालक आत्मा नाशिक यांनी शेतकऱ्यांना यंत्रा द्वारे भात लागवडीचे फायदे सांगितले, यामध्ये पारंपरीक पद्धतीपेक्षा बियाणे कमी लागते, रोपांची मर कमी होते. लागवड खर्चात निम्मी टक्के बचत होते. भात उत्पादनात चांगली वाढ होते. मजुरांची संख्या कमी लागते. एका दिवसात ३ ते ४ एकर भात लागवड होते. शेतकऱ्याला हव्या त्या अंतरावर लागवड करता येते. शेतकऱ्यांची एकाच वेळी येणारी लागवड यामुळे मजुरांची टंचाई असते. यावर पर्याय म्हणून यंत्रा द्वारे भात लागवड करता येते. यावेळी लागवडीचे विविध व्हिडिओ दाखवण्यात आले. उप विभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ यांनी यंत्रासाठी नानाजी देशमुख प्रकल्पातून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी, आभार सहायक कृषी अधीकारी हरीश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रकल्प संचालक आत्मा नाशिक अभिमन्यू काशीद, उप विभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ,तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी येथील डॉ. अविनाश कोळगे, डॉ. सुरेश परदेशी, डॉ. दीपक डामसे, डॉ. संदीप निकम, त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, अजय खैरनार, सागर सिनारे, विजय जाधव,राजेंद्र चव्हाण, अरुण राऊत आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!