महिला, युवतींनी धाडसी वृत्तीने सजग व सक्षम होणे अत्यावश्यक – वैशाली गोसावी

इगतपुरीनामा न्यूज – सध्याच्या सर्वदूर घडत असलेल्या घटना, असुरक्षिततेचे वातावरण याबाबत समाजघटकात चिंता व काळजी व्यक्त होत असतानाच समाजात वावरताना मुलींनी व महिलांनी सजग व सक्षम होऊन धाडसी वृत्ती बाळगावी असे प्रतिपादन घोटी ग्रामपालिकेच्या सदस्या तथा प्रतिष्ठित महिला संघटक वैशाली विजय गोसावी यांनी केले. घोटी येथे सौ. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकाराने मुलींसाठी दोन दिवसीय संस्कार शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास शंभर मुलींनी सहभाग नोंदविला. या शिबिरात मुलींना आत्मिक बळ व धाडसी वृत्तीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरातून महिला मुलींनी घ्यावयाची काळजी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या आत्मसन्मानाला धक्का लागल्यास आपण सक्षमपणे धाडसाने प्रतिकार केला पाहिजे, संघर्षासाठी स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात केले पाहिजे. धाडस व प्रतिकारातून अशा प्रवृत्तींना पायबंद घातला पाहिजे. माता भगिनींना साथ देणारा वर्गही समाजात मोठ्या प्रमाणात आहे. या आधारावर संरक्षण कौशल्य शिकून महिलांनी समाजापुढे आदर्श निर्माण करावा असेही वैशाली गोसावी यांनी म्हणाल्या. याप्रसंगी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमाचे सर्व घटकातून स्वागत करण्यात आले. हे शिबीर व उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध महिला प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!