आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांचा २४ जून पासून जनसंवाद दौरा : इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ पिंजून काढणार

इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा विधानसभेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वर्गात लोकप्रिय असलेले उदयोन्मुख नेतृत्व लकी जाधव यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदार संघ पिंजून मतदार संघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपवली आहे अशी माहिती लकी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे येत्या २४ जून पासून जनसंवाद दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लकी जाधव यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मतदार संघातील पाण्याचे प्रश्न, शबरी घरकुल योजनेचे प्रश्न, जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांची मालिकाच समोर आणली होती. त्यामुळे आदिवासी समाजाने जागृत होत लकी जाधव यांच्या शब्दावर महाविकासचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पारड्यात भरघोस मते टाकून निवडून आणले. त्यामुळे आता परत लकी जाधव यांच्या या झंझावाती जनसंवाद दौऱ्याकडे पूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले असून लकी जाधव यांच्या लोकप्रियतेत अजून भर पडणार आहे. भविष्यात हा काँग्रेसचा असलेला मतदार संघ अजून मजबूत होण्याची चिन्हे अधोरेखित होत आहे. विशेष म्हणजे या पुर्वी एकाही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या जाणुन घेण्यासाठी जनसंवाद दौरा केलेला दिसुन आला नाही.

Similar Posts

error: Content is protected !!