दीड वर्षांपासून त्रस्त शेतकरी कुटुंबांची भावनिक साद
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2023/05/wp-1685028821697-1024x768.jpg)
इगतपुरीनामा न्यूज – माननीय आमदार हिरामण खोसकर साहेब, अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्या येण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत कुटुंबासह पुलाखाली आम्ही मुक्काम करून बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत. आपणही आमच्या आंदोलनाला साहाय्य करण्यासाठी यावे. जोपर्यंत पुलाचे काम होत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनात आपण सहभागी व्हावे. एकतर पुलाचे काम पूर्ण करा अथवा तिथून वाहणाऱ्या पाण्यात आम्हालाही वाहून न्या अशी मागणी बेलगांव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली आहे. या भागातील वैतागलेले शेतकरी कैलास संधान, गोकुळ गुळवे, कोंडाजी गुळवे, राजाराम पासलकर, बंडू धोंगडे, ज्ञानेश्वर कोकणे, विलास संधान, नाना भोर, बाळू मुसळे, सुरेश कोकणे, बाळू पासलकर, ज्ञानेश्वर संधान आदींचे संपूर्ण कुटुंब छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी म्हणजे १ जुनपासून बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत.
मुकणे धरणातील आवर्तनामुळे बांधकाम विभागाने बनवलेला पुलाच्या कामावरील तात्पुरता रस्ता पाण्याने सतत धुवून जात असतो. परिणामी ह्या भागाचा तालुक्याशी संपर्क तुटतो. नांदगाव बुद्रुक, पाडळी देशमुख मार्गे दूरवरून लोकांना मार्गक्रमण करावे लागते. ह्या ओंडओहोळ नदीवरील पुलाचे काम जलदगतीने करावे अशी जुनी मागणी असून सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त अन मस्त आहे. अस्वली ते मुंढेगाव हा रस्ता नागरिकांसाठी महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरील पुलाचे काम इगतपुरीच्या सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संथ गतीने सुरू आहे. मुंढेगावकडे जातांना येतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ आदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या ह्या पुलाचे काम १ जूनच्या आधी पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे महत्वाचे आहे. या भागातील लोकांची सहनशक्ती संपली असल्याने बिऱ्हाड आंदोलन होत आहे.