इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे १६५ जणांचा आतापर्यंत मृत्यू : मयताच्या वारसाला ५० हजारांच्या सहाय्यासाठी करावा लागणार अर्ज : “अशी” आहे अर्ज करण्याची कार्यपद्धती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

कोरोनाचा भयानक काळ मार्च २०१९ ला सुरू झाला. तेव्हापासून १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे १६५ व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील पत्ता गृहीत धरून त्या त्या तालुक्यात याद्या बनवण्यात आल्या असल्याचे समजते. ‘कोविड-१९’ आजाराने मृत पावलेल्या ह्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांच्या सानुग्रह सहाय्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. ह्या सहाय्याबाबत अर्ज करण्यासाठी शासनाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येणार आहे. इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

ह्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास, त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील ( पर्यायी ) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!