इगतपुरीनामा न्यूज, दि. २
मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. गोंदे फाट्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे. ह्या पार्श्वभूमीवर गोंदे फाट्यावरून गावाच्या दिशेने रस्ता ओलांडणाऱ्या ३ जणांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना आज रात्री साडेआठ वाजता झाली. ह्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दीपक तुकाराम रेरे वय ३६ वाळू देवराम शेंडे वय २७ दोघे रा. विहिगाव ता. शहापूर, योगेश तुकाराम साठे वय २८ रा. गोंदे दुमाला हे तिघे रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने तिघांना उडवल्याने अपघात झाला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. गतिरोधक बसवून अपघातांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.