प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
कुऱ्हेगाव तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज कुठलीही पुर्वसुचना न देता वाडीवऱ्हे महावितरणकडुन खंडित केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर वीजपुरवठा पुर्ववत करावा अन्यथा जनआंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेच्यावतीने माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाडीवऱ्हे वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता धवल आगरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. महावितरण कंपनीकडून सध्या थकीत विजबिल वसुलीसाठी धडक मोहीम राबवली जात आहे. मात्र अचानकपणे कुठलीही पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित केली जात आहे. यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले जात असुन शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी महावितरणने थोडा अवधी द्यावा, खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करावा अन्यथा जनआंदोलन केले जाईल असा इशारा आज वाडीवऱ्हे महावितरण कंपनीचे उपअभियंता धवल आगरकर यांची भेट घेत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वाडीवऱ्हे गटप्रमुख दिलीप मुसळे, गणप्रमुख अंबादास धोंगडे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.