राज्यपाल, कृषिमंत्री यांच्या हस्ते पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना शेतीमित्र पुरस्कार प्रदान : पुरस्कार एका व्यक्तीचा नसून हा महाराष्ट्राच्या कृषी परंपरेचा गौरव – कृषिमंत्री ना. भरणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२४ महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वरळी येथे कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै या कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांचे कौतुक करण्यात आले. दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही प्रयोगशील आणि नावीन्यपूर्ण शेती करून अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले पुरस्कार विजेते शेतकरी हेच कृषी विभागाचे खरे राजदूत आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांनी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि जलसंधारणाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी क्षेत्रात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुढील वर्षापासून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषी रत्न पुरस्कार’ सुरू करण्यात येणार आहे. आज शेतकऱ्यांना मिळालेले हे पुरस्कार व सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून त्यांच्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राच्या कृषी परंपरेचा गौरव आहे. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यासह राज्यातील १८९ कृषि पुरस्कार विजेते उपस्थित होते.

error: Content is protected !!