
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरीचे संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील यांनी उपस्थित भात उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. डॉ. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी विद्यापीठांनी विकसित केलेल्या सुधारित भात बियाण्यांचा वापर करावा. तसेच भात पिकात युरिया बिकेट (गोळी खत) वापरल्यास उत्पादनात वाढ होते. गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका तयार केल्यास रोपे अधिक सशक्त व निरोगी तयार होतात. रोपवाटिकेपासून ते भात काढणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध विविध योजना व अनुदानाबाबत माहिती दिली. सहायक कृषी अधिकारी विजय कापसे यांनी जमीन आरोग्य पत्रिका आणि त्यानुसार खत व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देत भात शेतीचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकृषी अधिकारी किशोर भरते यांनी केले, तर सूत्रसंचालन जनार्दन झडे यांनी केले. यावेळी सरपंच सुनिता कोरडे, माजी सरपंच काशिनाथ कोरडे, गोरख कोरडे, राजाराम खादे, एकनाथ खादे, पांडुरंग कोरडे, बाळू कोरडे, मारुती कोरडे, तुकाराम कोरडे, सक्रूबाई कोरडे, ग्रामपंचायत सदस्य सुमन भांगरे, मीराबाई खडताळे, कृषिताई जयश्री कोरडे, ताराबाई कचरे, संजय थेटे, बायफचे किरण इंगळे, राम कोतवाल, श्रद्धा सावंत, सहाय्यक कृषी अधिकारी पांडुरंग कोकणे, सुनील गायकवाड, शांताराम गभाले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.