
इगतपुरीनामा न्यूज – तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्यामार्फत विविध गावांमध्ये अल निनोच्या संभाव्य प्रभावाबद्धल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून राहुलनगर येथे शिवार फेरीचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलतांना इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी अल निनो बाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यावर्षी कमी पाऊस किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची आणि पाण्याचा पिकावर ताण पडण्याची शक्यता आहॆ. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे भाताचे वाण वापरावे. सरी वारंभा पद्धत वापरून भाताची रोपे तयार न करता भात बियाणे पेरण्याचा प्रयोग करून पाहावा. यामुळे सरीमध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग पावसाने ताण दिल्यावर नक्कीच होईल.
यावेळी दगडू दूंदा भोईर यांचे शेतात एसआरटी पद्धतीने भात पेरणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील यांनी भात टोकून किंवा पेरणी केल्याने चिखलणीचा खर्च वाचतो. आवणीच्या वेळेस मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. या पद्धतीत फक्त घरातील तीन जणांकडून पेरणीचे काम झाल्याने मजुरीचा खर्च वाचतो. प्रात्याक्षिक विजय कापसे, किशोर भरते यांनी करून दाखवले. या फायदेशीर पद्धतीचा वापर करणारे शेतकरी रवी करंजकर यांनी आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, उप कृषी अधिकारी किशोर भरते, सहाय्यक कृषी अधिकारी विजय कापसे, दूंदा भोईर, पोपट भले, सोमनाथ आगिवले, गोविंद लांघी, बाळू लहामगे, सागर सूर्यवंशी, सचिन भोईर, संपत घाणे, पोपट तेलोरे, शिवाजी काठे, अनिल काठे, नवनाथ भोईर आदी शेतकरी उपस्थित होते.
एसआरटी ही पेर भात पद्धत आहे. भाताची गादी वाफ्यावर साच्याद्वारे 25 ×25 सेंमी अंतरावर छिद्रे पाडून त्यामध्ये भाताचे बियाणे टाकले जाते. यामध्ये चिखलणीचा खर्च होत नाही. बियाणे कमी प्रमाणात लागते. घरातील तीन व्यक्तीद्वारे पेरणी करता येते. त्यामुळे वेळेची खर्चाची बचत होते. त्यामुळे एकूणच उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढते.
– किशोर भरते, उप कृषी अधिकारी, इगतपुरी