
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गिरणारे गावात वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे आणि कमी-जास्त व्होल्टेजच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर धडक दिली. ॲड. मुन्ना पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा निषेध करत, वीजपुरवठा खंडित असलेल्या प्रत्येक तासासाठी ग्राहकांना १०० रु. भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. काल मंगळवारी १४ जुलैला सायंकाळी ५ वाजल्यापासून गिरणारे गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री ११ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला खरा, मात्र अवघ्या १०-१५ मिनिटांत पुन्हा कमी व्होल्टेजमुळे वीजपुरवठा बंद झाला. या प्रकारामुळे ग्रामस्थांना रात्रभर अंधारात रहावे लागले. याचा फटका विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना बसला असून, पाणीपुरवठा विस्कळीत झाला. घरगुती उपकरणे खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. गिरणारे गावातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करून कमी-जास्त व्होल्टेजची समस्या कायमस्वरूपी दूर करावी. भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना त्वरित राबवाव्यात. महावितरणच्या नियमांनुसार वीजपुरवठा खंडित असलेल्या प्रत्येक तासासाठी ग्राहकांना १०० रु. प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.
या मागण्यांचे ॲड. मुन्ना पवार यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. अधिकाऱ्यांनी मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनात ॲड. मुन्ना पवार यांच्यासह अकिब अब्दुल समद शेख, दिलीप भीमराव नरोडे, सुनील संतू पाटील, इनामूल्ला बिस्मिल्लाह शेख, रामसिंग प्रेमसिंग भंडारी, श्रीकांत सदाशिव आंबेकर, प्रकाश किसन साळुंखे, सचिन पारसमल छाजेड, सत्तार इस्माईल मणियार, वसीम रऊफ शेख, मझहर अत्तार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गिरणारे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.