
इगतपुरीनामा न्यूज – भावली डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य ३ आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भावली डॅम परिसरात काही पर्यटक कुटुंबासह फिरण्यासाठी आले होते. यावेळी काही समाजकंटकांनी या कुटुंबावर अचानक प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पथक कार्यरत होते. दरम्यान, पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, हे आरोपी मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंढेगाव शिवारात दुचाकीवरून जात आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी मुंढेगाव शिवारात सापळा रचला आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. राहुल भोरु भागडे (वय २६, रा. नांदगाव सदो), आकाश चंद्रकांत भोईर (वय २७, रा. नांदगाव सदो), कैलास अशोक भागडे (वय २८, रा. नांदगाव सदो) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या कारवाईत गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल क्र. एमएच१५ केए ४५०२ ही देखील जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी राहुल भागडे आणि आकाश भोईर हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर इगतपुरी व घोटी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलीस पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत. इगतपुरी तालुक्यातील भावली परिसरात पर्यटकांवर हल्ला करत दहशत माजविणाऱ्या आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यावरून तोंड झाकून धिंड काढल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही धिंड काढत कायदा व सुव्यवस्था कोणी मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा व नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालकिल्लाच असल्याचा पोलिसांनी संदेश दिला. इगतपुरीकरांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.