इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला वेग : ‘नियंत्रित पद्धती’चा अवलंब करण्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भात पुनर्लागवडीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची अनिश्चितता कायम असल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी आधुनिक आणि नियंत्रित पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे. इगतपुरी हा तालुका भात उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र असून येथे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिरा रोपे टाकली आहेत. अशा स्थितीत रोपांची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, उत्पादनात वाढ करण्यासाठी ‘नियंत्रित लागवड पद्धत’ (जपानी पद्धत) फायदेशीर ठरेल, असे श्री. मडके यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. कुरुंगवाडी, बारशिंगवे, उभाडे, उंबरकोन, दौंडत, जानोरी, परदेशवाडी, शेवगेडांग, शेणवड खु./बु., घोटी बुद्रुक, माणिकखांब, नांदगाव सदो, आडवण, वाळविहीर आणि फांगुळगव्हाण यांसह अनेक गावांमध्ये कृषी विभागातर्फे नियंत्रित लागवडीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी उपकृषी अधिकारी किशोर भरते, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे, संजय पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना सातपुते, विजय कापसे यांनी विशेष मार्गदर्शन केले. कुरुंगवाडी येथील लक्ष्मण सावंत यांच्या शेतात आणि बारशिंगवे येथे हिराबाई घाणे यांच्या शेतात झालेल्या प्रात्यक्षिकांच्या वेळी अनेक शेतकरी हजर होते. बारशिंगवे येथे हिरामण भले, कविता रुपवते, कविता बोराडे, ज्योती भोईर, हिराबाई घाणे, हिराबाई लांघी, नमिता लांघी, सोनुबाई लांघी, मीना लांघी, वनिता भोईर, सुवर्णा घाणे, मीराबाई बोराडे, मनीषा साबळे, सुवर्णा कोरडे, सखुबाई घाणे, नंदाबाई कोरडे, सुरेखा तारगे, शोभाबाई घाणे, झुंबर लहामगे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास होणारी लागवड याच आधुनिक पद्धतीने करावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

नियंत्रित लागवड पद्धतीचे खूप फायदे असून दोरीच्या साहाय्याने १५x२५ सेमी किंवा २५x२५ सेमी अंतरावर पुनर्लागवड करावी. या पद्धतीत रोपांची संख्या कमी लागते, ज्यामुळे बियाण्यांची बचत होते. योग्य अंतरामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश व हवा मिळते, परिणामी फुटवे जास्त येऊन उत्पादन वाढते. या पद्धतीमुळे 'युरिया ब्रिकेट'चा प्रभावीपणे वापर करणे सोपे जाते.
- किशोर भरते, उप कृषी अधिकारी
error: Content is protected !!